Jayant Patil-Sandeep Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

Beed News : क्षीरसागरांच्या घरासमोर जमाव जमताच बीडच्या एसपींना मी ८ ते ९ वेळा फोन केला, मात्र...; जयंत पाटलांचा आरोप

Vijaykumar Dudhale

Beed : आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरासमोर जमाव जमला आहे, ताबडतोब उपाय योजना कराव्यात, यासाठी मी बीडच्या एसपींना आठ ते नऊ वेळा फोन केला. मात्र, तो फोन घ्यायलाही त्यांना वेळ नव्हता. कदाचित ते घाईत असतील. जमाव त्या वेळी क्षीरसागरांच्या घरासमोरच होता. पोलिस त्यांना वाचवत असतील, असं मी समजतो. पण क्षीरसागर हे सांगत होते की, पोलिस नुसतेच कमरेवर हात ठेवून उभे आहेत, ते काहीच करत नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलिसांवर केला. (Jayant Patil made allegations against police in connection with the attack on Sandeep Kshirsagar's house)

मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू असताना बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळण्यात आले. त्याची पाहणी आमदार पाटील यांनी आज (ता. ७ नोव्हेंबर) केली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी गृह विभागाच्या अपयशावर बोट ठेवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एसपींनी फोन उचलला नाही; म्हणून मी आयजींना फोन केला. त्यांनी माझा फोन घेतला. ठीक आहे की ज्यावेळी दंगल चालू असते, त्यावेळी डीवायएसपी अथवा एसपींनी नेत्यांचे फोन घ्यावेत, असे मीही मानत नाही. पण, ज्यांच्यावर हल्ला होतो, ते संदीप क्षीरसागरही म्हणत होते की पोलिस काही करत नाहीत, असेही पाटील यांनी नमूद केले.

ओबीसी समाजाला टार्गेट करण्याचा डाव होता, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. त्याबाबत जयंत पाटील म्हणाले की, बीडमध्ये जे हल्ले झाले, तसे हल्ले महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झाले नव्हते. किंबहुना, पोलिसांनी दिवसभर त्यात कुठलाही हस्तक्षेप केला नाही. जमाव एका घराकडून दुसऱ्या घराकडे चालत जात होता. हे अतिशय आश्चर्यकारक आणि गंभीर आहे. काही ठरावीक लोकांना टार्गेट करायचं काम हे चुकीचंच आहे. त्याचे कुणीही समर्थन करणार नाही.

सरकार इंटेलिजिन्समध्येही कमी पडलं. कारण असं घडणार आहे, हे गृह विभागाला माहिती व्हायला पाहिजे होतं. ज्या दिवशी घटना घडत होती, त्याच दिवशी पोलिसही आपल्या जबाबदारीपासून लांब राहिले. लोकांच्या मनात अशी शंका येते की, कुणी पॉन्सर्ड केले आहे का हे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. त्याचं समर्थन कोणीही करणार नाही, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT