Jaidatta Kshirsagar News Sarkarnama
मराठवाडा

Beed politics : राजकीय परिस्थिती विचित्र ; धुरळा शांत होऊ द्या मग निर्णय घेऊ : जयदत्त क्षीरसागरांची सावध भूमिका

सरकारनामा ब्यूरो

Beed News : गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात आपण कधीच अपयशाने खचलो नाही अन् सत्तेमुळे हुरळून गेलो नाही. विकास आणि समाजकारण या माध्यमातूनच जनतेशी जोडल्या गेलो आहोत. सध्याची राजकीय परिस्थिती फार विचित्र आहे, धुरळा आणि फुफुटा प्रचंड उडालाय. त्याला शांत होवू द्या, नंतर निर्णय घेवू, राजकारणामध्ये संयम महत्वाचा असतो, अशी भूमिका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydattaji Kshirsagar) यांनी व्यक्त केली.

क्षीरसागर यांना सोडून पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गट प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांची सर्वसाधारण सभा रविवारी झाली. यावेळी त्यांनी राजकीय वाटचालीची भूमिकाही मांडली. क्षीरसागर म्हणाले, आपण अनेक यश-अपयश पचवले. काळजी करून नका मी खंबीरपणे उभा आहे. बीड शहर आणि मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचा आपण प्रयत्न केला. रूग्णालय, रस्ते, सिंचनाची अनेक कामे केली. राजकारणामध्ये संयम महत्वाचा असून यश मिळवण्यासाठी जनतेचा विश्वास आवश्यक असतो.

यापुढे सर्व निवडणुका आपण मोठ्या ताकदीने लढवणार आहोत. सध्या धुरळा आणि फुफुटा प्रचंड प्रमाणात उठला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून दोन्ही भावाच्या मुलांना राजकारणात सक्रिय केले. मात्र, प्रवाहाच्या दिशेने त्यांनी वाटा निवडल्या हा त्यांचा निर्णय आहे. पण, रक्ताच्या नात्यापेक्षा तुमचे माझ नात घट्ट आहे. साथ द्या मी शक्ती देतो. जिल्हा क्रांतिकारक व अत्यंत प्रभावशाली विचारांचा आचारांचा व लोकांचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला जेव्हा गरज भासली तेव्हा-तेव्हा बीड जिल्ह्याने नेतृत्व उभे केले.

संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या काकूंनी अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा हातात घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रस्थापित लोकांनी विरोध केल्यानंतरही त्यांनी खासदार म्हणून एक हाती निवडणूक जिंकली होती. त्यांच्या त्या राजकीय नेतृत्वाचा वसा व वारसा पुढे त्याच ताकदीने जिवंत ठेवण्याचे काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी केले. माझ्यावर विश्वास ठेवा मी जो निर्णय घेईल तो तुमच्या हिताचा असेल. आज माझ्याबरोबर या काळात जो उभा राहील त्याच्यासाठीच माझ्या उद्याच्या चांगल्या काळात सुगीचे दिवस असतील, याची खात्री बाळगा. कोणताही देव एका नवसाने पावत नाही अथवा कोणते नेतृत्व एखाद्या पराभवाने संपत नाही.

अशावेळी घाई करून चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा निर्णय घेण्यासाठी योग्य वेळेची व संधीची वाट पाहण्यातच खऱ्या नेतृत्वाचे कौशल्य आहे. त्यामुळे आपण सर्वांच्या सहमतीने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ व पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या राजकारणात गरुड झेप काय असते हे सगळ्यांना दाखवून देऊ, असा विश्वासही जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. कोणी चुकीचे निर्णय घेऊन आपल्याला बदनाम करीत असेल तर अशा लोकांनाही आपण माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT