Kailash Gorantyal Sarkarnama
मराठवाडा

MLA Kailash Gorantyal News : एका नेत्यामुळे काँग्रेसच्या गद्दारांवर तेव्हा कारवाई झाली नव्हती, आता सोडू नका; आमदार गोरंट्याल आक्रमक !

Jagdish Pansare

Jalna News : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी गद्दारी केली. याआधी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत हेच आमदार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाला जबाबदार होते. तेव्हा एका मोठ्या नेत्यामुळे या गद्दारांवर कारवाई टळली, पण आता त्यांना सोडू नका. सात गद्दारांमुळे काँग्रेसच्या तीस प्रामाणिक आमदारांचे भवितव्य धोक्यात आणू नका,असे आवाहन जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल केले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गोरंट्याल यांनी विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करून काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांविरुद्ध आक्रमक पावित्रा घेतला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत गद्दारी केल्यानंतर कारवाई झाली नाही,म्हणून त्यांनी पुन्हा हिंमत वाढली, असेही गोरंट्याल यांनी म्हटले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्यामुळे पक्षाची नाचक्की झाली आहे.

आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधान परिषदेसाठी मतदान होण्याच्या आधी काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचे संकेत दिले होते.प्रत्यक्षात घडले ही तसेच.पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि मराठवाड्यातील आमदारांचा यात समावेश आहे.काँग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) गेलेल्या आणि आता राज्यसभेवर खासदार असलेल्या नेत्यामुळे राज्यसभेत गद्दारी करूनही या आमदारांवर कारवाई झाली नव्हती,असा आरोप करत गोरंट्याल यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.

विधान परिषदेत काँग्रेसचे उमेदवार पाडले तर तुम्हाला केंद्रात मंत्री करु, अशी ऑफर कदाचित त्या नेत्याला दिली गेली असेल. म्हणूनच त्यांच्या बगलबच्चांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली.राज्यसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधील एक मोठा नेता भाजपमध्ये दाखल झाला होता, मी त्याचे नाव घेत नाही, तुम्ही ते ओळखून घ्या.त्याच्या समर्थक आमदारांनी तेव्हाही गद्दारी केली होती,त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता.

पक्षश्रेष्ठींकडे ही सगळी नावे आली होती,पण लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या नेत्यावर कारवाई केली तर लोकांसमोर चुकीचा संदेश जाईल,असे सांगून कारवाई टाळण्यात आली होती. त्यामुळे हिंमत वाढलेल्या या गद्दार आमदारांनी विधान परिषदेत तेच केले. कोणी विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून,तर काहींनी विकास निधी आणि वरून 25-50 कोटी रुपये मिळाले म्हणून गद्दारी केली.

या सगळ्यांची नावे आणि त्याचा अहवाल काँग्रेसच्या (Congress) पक्षश्रेष्ठींकडे गेला आहे.कदाचित 19 तारखेच्या बैठकीत त्यांची नावे जाहीर केली जातील आणि त्यांच्यावर कारवाई देखील होईल, असेही गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. भविष्यात कदाचित राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल,पण त्याआधी गद्दारांवर कारवाई करून प्रामाणिक आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगला मेसेज गेला पाहिजे, यासाठी क्रॉस वोटिंग करणाऱ्या सात आमदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे गोरंट्याल म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT