Sambhaji Patil Nilangekar, Amit Deshmukh News sarkarnama
मराठवाडा

Latur Political News: पालकमंत्री म्हणून कुणी काय केले? एकदा होऊन जाऊ द्या ; निलंगेकरांनी बॅंड वाजवला..

राम काळगे

Marathwada Political News: निलंग्याचा नवरदेव दिल्लीत ठरतो, पण यावेळी दिल्ली जो नवरदेव ठरवेल त्याचा बँड वाजवण्यास मी निलंग्यात येणार, अशी उपरोधीक टीका कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमित देशमुख यांनी, पारंपरिक विरोधक व भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर केली होती. काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि धोंडेजेवण कार्यक्रमातील ही टीका निलंगेकर यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

निलंगेकरांनी देशमुखांना आपापल्या पालकमंत्री काळात (Latur) लातूर जिल्ह्यासाठी केलेली विकासकामे आणि आणलेला निधी याची एकदा जाहीर चर्चा होऊन जाऊ द्या, अशा शब्दात आव्हान दिले आहे. वेळ, ठिकाण, तुम्ही सांगा मी व्यवस्था करतो, असे म्हणत (Sambhaji Patil Nilangekar) निलंगेकरांनीच खऱ्या अर्थाने देशमुखांचा बॅंड वाजवल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू झाली आहे. निलंगेकर विरुद्ध देशमुख या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील कलगितुरा पुन्हा एकादा पहायला मिळणार आहे.

आता निवडणुका जवळ आल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून तुम्हाला माहीतच आहे की, पावसाळ्यात ओरडणारे बेडूक येतात त्याकडे आपण लक्ष द्यायचे नाही. फक्त विकासाकडे लक्ष द्यायचं, असे म्हणत निलंगेकरांनी (Amit Deshmukh) देशमुखांना बेडकाची उपमा दिली. अनसरवाडा येथील बॅंड संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तेव्हा नेमका अमित देशमुख कुणाचा बँज वाजवतील माहीत नाही, परंतु निलंग्याच्या बँडनेच आम्ही बॅंड वाजवणार आहोत, असा इशारा देखील निलंगेकर यांनी देशमुखांना दिला.

धोंडेजेवण कार्यक्रम असला तरी मी पण देशमुखांचा जावाई आहे, ते मला पण बोलवतील अशी अपेक्षा होती, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात निलंगेकर बोलत होते. निलंग्यात येऊन विकासाचं बोलण्यापेक्षा अडीच वर्ष तुम्हीही पालकमंत्री होतात व मी ही पालकमंत्री, दोघेही एकत्र बसू तुम्ही ठिकाण सांगा व्यवस्था मी करतो, होऊन जाऊ द्या एकदा. कोणी किती विकास केला व कोणत्या कामासाठी किती निधी आणला, हे तुम्हाला माझे खुले आव्हान आहे.

मराठवाड्यासाठी किती टीएमसी पाणी देणार यापेक्षा जिल्हानिहाय वाटा आवश्यक असून लातूरच्या पाणी प्रश्नासाठी थेट स्त्रोतामध्येच जिल्हानिहाय वाटा मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. भविष्यात पाणी, शिक्षण व रोजगार यासाठी प्रसंगी जनांदोलन उभारण्याचा इशाराही निलंगेकरांनी दिला. निलंगा हा स्वाभिमानी तालुका असून स्वतः निलंगेकर साहेबांनी या तालुक्याला एकसंघ ठेवून आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. तसे पाहता या जिल्ह्यातील राजकारणात शिवाजीराव पाटील चाकूरकर, स्व. विलासराव देशमुख, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास साधला आहे.

आपणास तीच विकासाची भाषा तोच विकास व तालुका एकसंघ ठेवायचा आहे. आपण कोणत्याही पक्षात असाल आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे. जसं पश्चिम महाराष्ट्रात त्या भागातील सर्व लोकप्रतिनीधी वेगवेगळ्या पक्षात अथवा विचाराचे असले तरी विकास योजनांसाठी एकत्र येतात. त्या पध्दतीने जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

आपण वेगवेगळ्या पक्षात असूनही एकत्र आलो तर आपल्या जिल्ह्याचा विकास अधिक उंचीवर घेऊन जाता येईल, असे आवाहनही निलंगेकरांनी विरोधकांना केले. त्यांनी विरोधकांना यावेळी केले. शिवाजी चौक ते अंबाजोगाई हा लातूरमधील रस्ता आपण केला असून एवढेच नाहीतर तुमच्या बाभळगाव वरुन जाणारा लातूर जहीराबाद हा महामार्गही मीच केला. तरीही आम्ही काहीच बोलत नाही, आपणही विचार करून बोलावं असा सल्लाही निलंगेकरांनी भाषणाच्या शेवटी देशमुखांना दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT