Maha Vikas Aghadi sarkarnama
मराठवाडा

MahaVikas Aghadi : धारशिव जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद, पण काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ मिळेना!

सरकारनामा ब्युरो

शीतल वाघमारे

Dharashiv : निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी महायुतीत लगबग वाढली आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या डझनभर उमेदवारांनी लक्ष वेधण्यासाठी विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. पक्षीय पातळीवर महायुतीने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, एका बाजूला वेगवान हालचाली सुरू असताना महाविकास आघाडीत उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गट वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, अशी परिस्थिती जिल्हा पातळीवर पाहायला मिळत आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी (NCP) बळकट होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील मोठे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी कमकुवत झाली. अशक्त असलेल्या भारतीय जनता पक्षाला (BJP) पाटील यांच्या प्रवेशामुळे बळ मिळाले. सशक्त असलेल्या राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली. तेव्हापासून आजवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला जिल्ह्यात राजकीय संघटन उभे करता आले नाही. तुलनेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी संघटनात्मक पातळीवर अधिक सक्षम आहे. शरद पवार यांना भेटून जिल्हाध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी गाऱ्हाण्यांची मोठी यादी सादर केली आहे.

आजवर झालेल्या एकूण 17 लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल 11 वेळा धाराशिव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने यश मिळविले आहे. काँग्रेसच्या यशाचा हा आलेख अन्य कोणत्याही पक्षापेक्षा वरचढ आहे. स्वतः वरचढ असलेला इतिहास जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी विसरले आहेत. 2014 नंतर अनेक नेत्यांनी विजेत्या पक्षाला सलाम करण्याची भूमिका स्वीकारली आहे.

जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या दोन्ही महत्त्वाच्या संस्थांमध्ये काँग्रेसचा सतत वरचष्मा राहिला आहे. जिल्ह्यातील उमरगा, लोहरा,तुळजापूर या तालुक्यातील तुलनेने काँग्रेस अधिक प्रभावशाली होती. मात्र तुळजापूर विधानसभा मतदारसंघ वगळता काँग्रेसला विशेष किमया सिद्ध करता आलेली नाही. 2019 मध्ये जिल्ह्यातील काँग्रेसचा एकमेव गड असलेला तुळजापूर विधानसभा मतदारसंघही भाजपने खेचून घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या नेत्याच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यांच्यासोबत जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी ही काँग्रेसला रामराम करण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जाते. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ही अद्याप कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्क्रिय असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे गटाचा उमेदवार मागील लोकसभा निवडणुकीत विजयी झाला. खासदार ओमराजे निंबाळकर लोकसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांची लोकप्रियता ही जमेची बाजू आहे. धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. महाविकास आघाडीतील अन्य दोन कमकुवत पक्षांना सोबत घेऊन लोकसभेचा गड राखण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. बलशाली महायुती विरुद्ध कमकुवत महाविकास आघाडी या राजकीय सामन्यात मतदार कोणासोबत उभे राहणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र सध्या तरी महाविकास आघाडी सगळ्याच पातळ्यांवर उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT