Mahadev Munde-Dnyaneshwari Munde News Sarkarnama
मराठवाडा

Mahadev Munde Case News : एसआयटी नेमली, तरी दोन वर्षापूर्वी हत्या झालेल्या महादेव मुंडे यांचे मारेकरी सापडेनात!

Dnyaneshwari Munde Appeal For Justice : या हत्येमध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्यांची नावेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, सगळ्यांना अटक करणार असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

Jagdish Pansare

  1. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत.

  2. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे असूनही कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.

  3. स्थानिक नागरिकांनी आणि राजकीय नेत्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Beed Political News : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या करून त्यांचा मृतदेह तहसील कार्यालयाच्या परिसरात टाकण्यात आला. प्लॉटच्या वादातून ही हत्या वाल्मीक कराडच्या टोळीने केल्याचा आरोप आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर खऱ्या अर्थाने महादेव मुंडे यांच्या हत्येची चौकशी आणि तपासाला वेग आला. मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यापूर्वी हत्येच्या तपासासाठी एसआयटी नेमली, परंतु महादेव मुंडे यांचे मारेकऱ्यांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही, अशी खंत व्यक्त केली.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या नेत्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरण उचलून धरले. आपल्याला न्याय मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही सातत्याने बीड (Beed News) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, आंदोलन केले. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीही महादेव मुंडे हत्याप्रकरणाची चौकशी आणि आरोपीच्या अटकेसाठी सरकारकडे प्रयत्न आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या सगळ्या प्रयत्नानंतरही महादेव मुंडे (Mahadev Munde) यांचे मारेकरी अजूनही फरार आहेत. महिनाभरापूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांनी तो हाणून पाडल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचे आश्वासन मुंडे कुटुंबीयांना दिले होते.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय देण्याची सरकारकडे मागणी केली. आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्यात आली. या भेटीत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला परळीतील बंगल्यावरून फोन आला आणि त्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास थांबवल्याचा आरोप केला. यासंदर्भात माहिती देताना तो फोन धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मीक कराडने केला आहे. यात अजून कोण आहेत? याचा सीडीआर काढण्याची विनंती केली.

या हत्येमध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्यांची नावेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यानंतर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, सगळ्यांना अटक करणार असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना दिला होता. एवढेच नाही तर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनूसार पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीही स्थापन केली. आता एसआयटी स्थापन होऊनही दोन महिने उलटले आहेत.

मात्र ना महादेव मुंडे यांचे मारेकरी सापडले नाही आणि हत्या प्रकरणाचा तपासही पुढे सरकला नाही. अजूनही ज्ञानेश्वरी मुंडे या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्यानंतरच बंद झालेला तपास पुन्हा सुरू झाला, खासदार बजरंग सोनवणे, सुप्रिया सुळे, आमदार सुरेश धस ही सगळी नेतेमंडळी आपल्या सोबत आहेत. सगळेच मला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दोन वर्षे उलटून गेली तरीही मारेकरी सापडत नाहीत, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही, अशी खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

FAQs

1. महादेव मुंडे कोण होते?
महादेव मुंडे हे परळीतील व्यापारी होते ज्यांची दोन वर्षांपूर्वी हत्या झाली.

2. या प्रकरणात तपास कोणाकडे आहे?
या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

3. मारेकरी सापडले का?
दोन वर्षांच्या तपासानंतरही मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत.

4. पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे?
पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले असून काही महत्त्वाचे धागेदोरे तपासले जात आहेत.

5. या प्रकरणात पुढे काय होणार आहे?
एसआयटीकडून नवीन चौकशी आणि पुरावे गोळा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT