Farmers Issue News : मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेती मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कसबसा वाचवलेला माल खरेदी केंद्रावर विक्रीसाठी न्यावा तर तिथे बारदाना नाही, अशा दृष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. हमीभावापेक्षा व्यापारी प्रति क्विटंल तीनशे ते चारशे कमी दराने हरभरा विकत घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत, असा आरोप करत काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान, व्यापाऱ्यांकडून होणारी लूट तातडीने थांबवण्यासाठी हरभरा खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करून द्या, किचकट नियम रद्द करा, अशी मागणी अमित देशमुख यांनी सरकारकडे केली आहे. लातूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने मागच्या आठ दिवसापासून हरभरा खरेदी बंद असल्याची बाब अत्यंत गंभीर असून राज्यभरात अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
अगोदरच अडचणीत असलेला शेतकरीवर्ग आणखीन संकटात सापडणार आहे. शासनाने या अडचणीची तातडीने दखल घेऊन सर्व हमीभाव खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करून द्यावा. एकट्या लातूर जिल्ह्यात यावर्षी जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झाली होती. मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि गारपीटी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील या पिकाची नासाडी झाली.
या अस्मानी संकटातून उरलेसुरले पीक अत्यंत काळजीपूर्वक काढून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा प्रत्यक्ष आडत बाजारात हरभऱ्याला क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपये कमी भाव मिळतो आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी आपला हरभरा हमीभाव केंद्रावर घेऊन येत आहेत.
लातूर जिल्ह्यात एकूण 23 हमीभाव केंद्र सुरू झाली असून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांचा हरभरा या ठिकाणी खरेदीसाठी स्वीकारला जात आहे. ऑनलाइन नोंदणीची किचकट प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी आपला हरभरा हमीभाव केंद्रावर घेऊन येत आहेत, मात्र या ठिकाणी बारदानाच उपलब्ध नसल्याने त्याची खरेदी ठप्प असल्याचे निदर्शनास येत आहे. अवकाळी पावसात हरभरा भिजण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वर्ग ताडपत्रीने झाकलेल्या वाहनात हरभरा घेऊन खरेदी केंद्राबाहेर रांगा लावून थांबले आहेत. खरेदी होत नसल्याने वाहन भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांवर पडत आहे.
गेल्या वर्षीही हमीभाव केंद्रावर बारदाना नसल्यामुळे जवळपास पंधरा दिवस सोयाबीन खरेदी बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. काही खरेदी केंद्र चालकांनी तर शेतकऱ्याकडूनच बारदाण्याचे पैसे वसूल केले, एवढे सर्व होऊनही शेतकऱ्याकडील संपूर्ण सोयाबीन खरेदी करण्यापूर्वीच तेव्हा ती खरेदी केंद्र बंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
आता पुन्हा हरभरा हमीभाव केंद्रावर त्याच प्रकारची अडचण निर्माण होऊन शेतकऱ्यांची पिळवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासन आणि संबंधित विभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन लातूर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हमीभाव खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अमित देशमुख यांनी शेतकर्यांच्या वतीने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.