Mumbai News : राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या दहा जागेसाठी निवडणूक होत आहे. शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षात जोरदार रस्सीखेच दिसून आली. विधान परिषदेच्या दहा जागेसाठी दहा जणांचे उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला नऊ जागा आल्या तर एकमेव जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आली आहे. रिक्त होत असलेल्या या दहा जागेवर केवळ दोन जणींनाच पुन्हा आमदारकीची संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे पाच जण पहिल्यांदाच आमदार होणार आहेत तर तीन जण माजी आमदार राहिले आहेत.
विधान परिषदेच्या या दहा जागेसाठी भाजपने (BJP) सहा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक उमेदवार दिला आहे तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. दहा जागेसाठी दहा जणांचे उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विशेषतः भाजपने सहा पैकी पाच नव्या चेहऱ्याना संधी दिली आहे. तर दुसरीकडे केवळ काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन रिंगणात उतरलेल्या प्रज्ञा सातव यांना भाजपने पुन्हा रिंगणात उतरवले आहे.
त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना सलग पाचव्यांदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या आमदारकीची मुदत १७ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे गोऱ्हे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुन्हा मैदानात उतरवले आहे. त्यांच्याशिवाय निवृत्त होत असलेल्या भाजपमधील रणजितसिंह मोहिते-पाटील, दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी यांना भाजपने पुन्हा संधी दिलेली नाही.
भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार या पाच नवीन चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या. त्यामध्ये नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर बच्चू कडू हे माजी आमदार आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल मिटकरी यांना पुन्हा आमदारकीची संधी न देता माजी आमदार झिशान सिद्दकी यांना या उमेदवारी दिली आहेत तर महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी न घेता माजी आमदार अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. दहा जागेसाठी दहा जणांचे अर्ज दाखल झाला असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.