महेश देशमुख
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर हा आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. जे छत्रपती संभाजीनगरात होते ते मराठवाड्यात होते असे बोलले जायचे. जेव्हा शिवसेना भरात होती तेव्हा छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ जालना, परभणी, धाराशिव, हिंगोली आणि काही प्रमाणात बीड या जिल्ह्यात शिवसेना विस्तारली. तेथून आमदार, खासदार, मंत्री आले. सोबतीला भाजप असल्याने मराठवाडा एक प्रकारे शिवसेना आणि भाजपचा भक्कम गड बनला होता.
जरांगे फॅक्टरची चर्चा असताना विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांत महाविकास आघाडी मराठवाड्यात बाजी मारेल असे चित्र असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच झाले. (Marathwada) मराठवाड्यातील मतदारांनी महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला. 46 पैकी 41 मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. प्रमुख विजेत्यांत गत मंत्रिमंडळात असलेल्या धनंजय मुंडे, अतुल सावे, संजय बनसोडे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.
नवोदितांत तीन महिलांसह पाच जणांनी बाजी मारली आणि ते प्रथमच आमदार म्हणून विधानसभेत जातील. घनसावंगी (जि. जालना) मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार राहिलेल्या राजेश टोपे यांना पराभवाचा धक्का बसला. लातूर ग्रामीणमध्ये दुसऱ्यांदा नशीब अजमावणाऱ्या काँग्रेसच्या धीरज देशमुखांनाही पराभवाचा सामना करावा लागला. (Mahayuti) त्यांचे बंधू आणि कॉँग्रेसचे मराठवाडा प्रमुख म्हणून पुढे येऊ घातलेले अमित देशमुख यांना काठावर 'पास' व्हावे लागले. सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनाही कडवी झुंज द्यावी लागली. नवोदित विजेत्यांत श्रीजया चव्हाण (भोकर), अनुराधा चव्हाण (फुलंब्री), संजना जाधव (कन्नड), विलास भुमरे (पैठण), प्रवीण स्वामी (उमरगा) यांचा समावेश आहे.
निकालावर जरांगेंचा प्रभाव नाही
बहुतांश जिल्ह्यामध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे 'एक है तो सेफ है', 'बटेंगे तो कटेंगे' हे 'नॅरेटिव्ह' देखील प्रभावी ठरले. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव महायुतीला मारक ठरेल, असे अंदाज असताना हा प्रभाव फारसा दिसलाच नाही. अचानक भूमिका बदलत त्यांनी उमेदवार न देण्याची भूमिका घेतली.
त्यामुळे आरक्षण आंदोलनाची दमदार पार्श्वभूमीवर असूनही मतदारांनी मते महाविकास आघाडीकडे वळविली नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे मराठवाड्यातून ठाकरे घराण्याला कायमच आधार मिळाला. परंतु विधानसभेच्या या निवडणुकीत चित्र पालटले. उद्धव ठाकरेंच्या सभांना गर्दी झाली. त्यांच्या द्वेषमूलक भाषणांमुळे पक्षाला फटका बसला असे निरीक्षकांचे मत आहे.
भाजप आता मोठा भाऊ
मराठवाड्यात आतापर्यंत शिवसेनेसोबत राहून विस्तारात गेलेल्या भाजपने आता मात्र मोठ्या भावाची जागा घेतली आहे. महायुतीने जिंकलेल्या 41 पैकी 19 जागा एकट्या भाजपच्या आहेत. त्याशिवाय आता मराठवाड्यात भाजपचे अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, संभाजी पाटील निलंगेकर, राणा जगजितसिंह पाटील अशी बड्या नेत्यांची मजबूत फळी असणार आहे.
त्यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्रातील निवडणुकांवर भाजपचा प्रभाव राहील. तेथे शिंदेंच्या शिवसेनेकडे दुय्यम भूमिका असेल. पण 1987 पासून असलेला ठाकरे घराण्याचा प्रभाव बाजूला सारला गेलेला दिसेल. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांची अवस्थाही मराठवाड्यात बिकट झाली आहे.
पक्षीय बलाबल
एकूण जागा : 46
भाजप : 19
शिवसेना : 13
राष्ट्रवादी काँग्रेस : 8
रासप :1
शिवसेना (ठाकरे) : 3
काँग्रेस : 1
राष्ट्रवादी (शरद पवार) : 1
(महायुती - 41, महाविकास आघाडी: 5)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.