Manoj Jarange Patil Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange: विधानसभेच्या तोंडावरच जरांगेंनी टाकला मोठा डाव; शिंदे- फडणवीस- अजितदादांची डोकेदुखी वाढणार

Deepak Kulkarni

Jalna News : लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर चालल्याने मराठवाड्यात महायुतीला जोरदार धक्का बसला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र फायद्यात राहिली होती. आता आरक्षण नाही दिले तर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धारही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला आहेत. तशी त्यांनी तयारीही सुरू केली आहे.

याचदरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मोठा निर्णय घेतानाच 29 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महायुती सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या वर्षी 29 ऑगस्टला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू केलं होतं.या आंदोलनाला गुरुवारी(ता.29) वर्ष पूर्ण झाले.

त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी तब्बल 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक बोलावली होती.याच बैठकीत जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीची लढाई आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आंदोलक समन्वयकांनी कडाडून विरोध दर्शवला असून उपोषणाचा आपला निर्णय मागे घ्यावा अशी भावनिक आवाहनही त्यांनी जरांगेंना केले आहे.

जरांगे उपोषणावर ठाम...

आपण आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा शब्द मराठा बांधवाना दिला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढाईसाठी पुन्हा एकदा सहा कोटी मराठा एकत्र आणणार आहे. माझी आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना न्याय देण्याची जबाबदारी आहे. माझा समाज अडचणीत असल्याने येत्या 29 सप्टेंबरला उपोषण सुरू करणार आहे.अंतरवाली सराटीत उपोषणाला बसू दिलं नाही तर दवाखान्यात जाऊन उपोषण करणारच असा ठाम पवित्रा जरांगेंनी घेतला आहे.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवतानाच मोठा खळबळजनक दावा केला आहे. फडणवीसांचे लोक आपल्याला रात्री येऊन भेटतात. ही मंडळी आपल्याला भाजपमधील सगळे मिळून फडणवीसांचा काटा काढणार, त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत असं बोलतात असं वक्तव्य केलं आहे.यामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहेत.

तसेच देवेंद्र फडणवीसांचे 113 आमदार पाडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.छगन भुजबळांपेक्षाही अधिक जातीयवाद हा फडणवीसांनी पसरवला असा हल्लाबोलही त्यांनी केला. विधानसभा निवडणूक लढवायची की समोरचे पाडायचे याचा निर्णय निवडणूक जाहीर झाल्यावर समाजाला विश्वासात घेऊन घेतला जाणार आहे असेही मनोज जरांगेंनी यावेळी ठणकावून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT