Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange : गावानं साथ दिली अन् त्रासही सहन केला; मनोज जरांगे भावूक

Jagdish Pansare

Marathwada Political News : छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यातील समाज बांधवांनी साथ दिली, अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांनी प्रतिसाद आणि पाठिंबा दिला. पण या आंदोलनामुळे गावाला जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मनोज जरांगे पाटील Manoj Jarange यांच्या 8 जूनपासून अंतरवालीत सुरू झालेल्या बेमुदत उपोषणाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. काही जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देत उपोषणाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज सहाव्या दिवशी उपोषण स्थगित करताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

राज्यभरातील मराठा Maratha समाज बांधवांनी आंदोलनाला भक्कम साथ दिली. अंतरवालीतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद या संपूर्ण आंदोलन काळात मिळाला. पण गावाला या आंदोलनामुळे त्रासही झाला, त्याबद्दल मी गावकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. गावातील सर्व समाजाने प्रेमाने व गुण्यागोविंदाने राहावे, शांतता ठेवावी. आजपासून मंडप काढला जाईल, कीर्तन बंद केले जाईल, असे सांगताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले होते.

29 ऑगस्ट 2023 पासून अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू झाला. या दरम्यान अनेक घटना घडामोडी, आंदोलकांवर लाठीहल्ला, गोळीबारा सारख्या घटना घडल्या. आरक्षणाचे आंदोलन राज्य पातळीवर गेले. देशाच्या राजधानीत या आंदोलनाची चर्चा झाली.

राज्यातील सरकारने या विषयावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केले. काही निर्णय झाले, पण त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. दरम्यान, मराठवाडा व राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हिंसक आंदोलने झाली. त्यातून आरोप-प्रत्यारोप आणि आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रकार झाला. पण या सगळ्या प्रकारांना तोंड देत मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा सुरुच ठेवला.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर लागलेल्या आचारसंहितेमुळे हा लढा काही दिवस थांबला. पण निवडणूक निकालातून समाजाच्या मनात असलेला रोष दिसून आला. सत्ताधारी महायुतीला मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण राज्यात फटका बसला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी 8 जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. सहाव्या दिवशी सरकारने या आंदोलनाची दखल घेत महिनाभराची मुदत मागून घेतली.

पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास व्यक्त केला. 13 जुलै रोजी सरकार या विश्वासाला किती पात्र ठरते हे स्पष्ट होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे गावात जातीयवाद वाढत आहे, शांतता भंग होत आहे, असे सांगत अंतरवालीतूनच त्यांच्या उपोषणाला विरोध झाला. याची सल मनोज जरांगे पाटील यांच्या मनात होती. ती उपोषण स्थगित करताना जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT