Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : आरक्षणासाठी शरद पवारांना भेटलेल्या भुजबळांची जरांगेंनी पुन्हा शाळा घेतली; नेमके काय म्हणाले?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावरून तेढ निर्माण झाला असून तो सोडवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पुढारा घ्यावा, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची इच्छा आहे.

त्यासाठी त्यांनी 'सिल्व्हर ओक'वर जाऊन पवारांशी दीड तास चर्चा केली. आरक्षणाबाबत पवारांना भेटलेले भुजबळ कोणाचेच नाहीत. ते बेईमान असल्याचा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केला.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यावर जरांगे Manoj Jarange ठाम आहेत. तर ओबीसी प्रवर्गातून कुणालाही आरक्षण देऊ नये, असा आग्रह भुजबळांचा आहे. यावरून उभय नेत्यांमध्ये गेल्या दहा महिन्यांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आता भुजबळांनी राज्यात निर्माण झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी तिढा सोडवण्यासाठी पवारांशी चर्चा केली. त्यावर जरांगे पाटील यांनी भुजबळांवर एकेरी भाषेत जोरदार टीका केली.

मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळ Chhagan Bhujbal गेले काय आणि राहिले काय, कुठे बसले काय याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही. ते बेईमान आहेत. त्यांच्या घशात किती हात घाला तरी कोरडाच निघणार. ते कोणाचाच नाहीत. ते फक्त स्वतःचे घर कसे भरेल, हेच पाहतात. त्यांच्यासारखा बेईमान माणूस कोणत्याच समाजात जन्मू नये, अशा जहरी शब्दांत जरांगेंनी भुजबळांवर हल्लाबोल केला.

छगन भुजबळ यांना गोड बोलून दंगली घडवायच्या दिसतात. त्यांनी राज्यात अनेक वाद लावून दिले. त्यांच्यामुळे राज्यातील वातावरण दूषित झाले. आता जाऊन सांगतात की शांतता राहिली पाहिजे. त्यासाठी त्यांनी यापूर्वीच नीट वागायला हवे होते, अशी टीकाही जरांगेंनी भुजबळांवर केली.

दरम्यान, विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यावर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना राज्यातील आरक्षणाचा वाद पेटता ठेवायचा आहे, अशी टीका केली. त्यावर जरांगे म्हणाले, विरोधकांना काहीही वाटत असेल. मात्र आरक्षण देणे किंवा न देणे हे विरोधकांच्या हातात आहे की सत्ताधाऱ्यांच्या? विरोधकांना लाथ मारून काढून टाका. ते नाही आले तर नाही आले.

सत्ताधारी तुम्ही आहात. तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे तर तुम्ही द्या ना! तुम्हाला द्यायचे नाही, त्यांच्याकडे बोट दाखवता. त्या छगन भुजबळांच्या आहारी चालले. राज्यात मला शांतता हवी त्यासाठी याच्या-त्याच्या दारोदारी भीक मागत हिंडतात. शांतता शब्द वापरायचा आणि राज्यात दंगल घडवायची, असा भुजबळांचा डाव असेल, अशी शंकाही जरांगेंनी व्यक्त केली.

सरकार आणि विरोधक सारखेच आहेत. त्यांना सामान्य जनतेचे काही देणेघेणे नाही. हातातून वेळ निघून गेल्यावर समाजासाठी लढून काहीच उपयोग नाही. पण आपल्या समाजासाठी जीव गेला तरी चालेल. माझ्या बलिदानाने समाजाचे कल्याण तरी होईल. आता आरक्षणाबाबत शंकेचे वातावरण आहे. पण मी समाजासाठी जीवाची बाजी लावू शकतो, असे म्हणत जरांगे उद्विग्न झाल्याचे दिसले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT