Manoj Jarange Patil News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : आम्ही मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला, त्यांच्या शब्दाचा सन्मान केला, पण..

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी आरपारच्या लढाईसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. `मुख्यमंत्र्यांवर आम्ही विश्वास ठेवला, त्यांच्या शब्दाचा सन्मान केला. त्यांनी पाठवलेल्या मंत्र्यांवरही विश्वास ठेवला. (Manoj Jarange Patil News) मुख्ममंत्री आमच्या विश्वासाला पात्र ठरायला पाहिजे होते, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी जाहीर नाराजी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) येत्या 20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. तत्पुर्वी आज त्यांनी मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाची दिशा, मार्ग आणि तयारीची माहिती माध्यमांना दिली. आरक्षणावर ठाम असल्याचे सांगतांनाच जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.

`आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला. त्यांच्या शब्दांचा सन्मान ठेवत त्यांनी पाठवलेल्या मंत्र्यांवरही विश्वास ठेवला, त्यांचा सन्मान केला. (Maharashtra) पण मुख्यमंत्री आम्ही त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत. त्यांनी आमच्या विश्वासाला पात्र व्हायला हवं होतं. मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांवर राज्यातील ठिकठिकाणी दाखल झालेले गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन दिले होते. पण तेही पुर्ण केले नाही, तिथेही ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंतरवालीतील गुन्हे मागे घेऊ असे सांगितले होते, तिथेही विश्वासाला ते पात्र ठरले नाहीत. गुन्हे मागे घेण्याचा शब्द तर पाळला नाहीच, उलट आमच्याच लोकांना अटक केली, त्यांना नोटीसा दिल्या जात आहेत, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. कारण नसतांना आमच्या लोकांना नोटिसा दिल्याने वातावरण दुषित होत आहे, लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

लोकांना लोकशाही मार्गाने मुंबईत येऊ द्या, कायदा पायदळी का तुडवता ? आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत, तुम्हीही ते शांततेचं होऊ द्या, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. तुम्ही आम्हाला गोळ्या जरी घातल्या, तरी आम्ही आता माघार घेणार नाही, मागे हटणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

20 तारखेच्या आत अंतरवलीच्या बाहेर पाऊल टाकेपर्यंत सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं. आता चर्चा नाही, फक्त आरक्षण द्या आम्ही एका तासाचाही वेळ देणार नाही. मुंबईत निघणारा मोर्चा एवढा भव्य असेल की देशानेच काय पण जगाने एवढी गर्दी पाहिली नसेल, असा दावाही जरांगे पाटील यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT