Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : '' आरक्षण मिळेल नाहीतर, माझी अंत्ययात्रा...''; जरांगे पाटलांनी सरकारची मागणी दुसऱ्यांदा धुडकावली

Deepak Kulkarni

Jalna : आम्ही ओबीसीमध्ये आहोत. तरी आरक्षणापासून आम्हाला दूर ठेवले. आता चार दिवस देतो. मला अध्यादेश द्या, मला फोनवर कळवा. मी समाजाला शब्द दिला आहे. सात वर्ष आमची जात बाहेर राहली. ४ फेब्रुवारीपासून आमचे उपोषण सुरु आहे. सरकारला आणखी चार दिवस देतो. पण अध्यादेश काढल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. तुम्ही म्हणाल ते करतो, आधी अध्यादेश काढा. मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. पण अध्यादेश काढेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. पण शुक्रवारी या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर आंदोलन चर्चेत आले. तसेच या आंदोलनावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू आहे. दरम्यान, दुसऱ्यांदा सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली गावात दाखल झाले असून सरकारकडून मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे.

सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. आंदोलन एवढं ताणून चालत नाही, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. एक महिन्याचा वेळ द्यावा, असे महाजन म्हणाले. पण आधीच सरकारला सरकारला तीन महिन्यांचा अवधी दिलेला आहे. आता एक महिन्याचा वेळ कशासाठी हवा? अध्यादेशासाठी तीन दिवसांचा वेळ पुरेसा आहे. आधीही वेळ दिला आता गरज नसताना सरकार वेळ मागत आहात, असे जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसी समाज अंगावर येणार नाही. त्यामुळे आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या. माझ्यावर दबाव आणू नका. समाजासाठी माझी मरायची तयारी आहे. आणखी किती वेळ तुम्हाला द्यायचा. आरक्षण मिळत नसेल तर मला असंच मरु द्या. आरक्षण मिळेल, अन्यथा माझी अंत्ययात्रा निघेल. जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा असेही मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला सांगितले.

शिवसेना नेते अर्जुन खोतकर, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे यांचं शिष्टमंडळ अंतरवाली येथे दाखल झाले. यावेळी या शिष्टमंडळाने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांशी चर्चा सुरू होती.गिरीश महाजनांनी उपोषण मागे घ्या, आम्हांला तुमच्या तब्येतीची काळजी आहे अशी विनंती केली. तसेच मराठा आरक्षणासंबंधी ३० दिवसांची मुदत मागितली. आपल्याला या आंदोलनाचा शेवट गोड करायचा आहे. सरकारही मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचेही महाजन म्हणाले.

सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरु असतानाच आंदोलनकर्त्यांनी उपोषणस्थळी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यावेळी जरांगे पाटलांनी कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करू नका, असं बजावूनही ते शांत बसत नव्हते. अखेर चर्चेत अडचण य़ेत असल्याने जरांगे पाटील कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT