Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil Warning : शांतता रॅलीपूर्वीच जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले,'...मराठा समाज हातातून जाऊ देऊ नका!'

Deepak Kulkarni

दिलीप दखणे -

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यात शनिवारपासून (ता.6) शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. जरांगे पाटील बेमुदत उपोषण मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले आहेत. ते परत मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात शांतता रॅली काढणार आहेत. या रॅलीमुळे शिंदे सरकारची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या रॅलीपूर्वीच जरांगे पाटलांनी सरकारला मराठा आरक्षणावरुन इशारा दिला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी (ता.5) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. जरांगे पाटील म्हणाले, सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मते जोडण्याचे काम सुरू केलं आहे. पण हे करत असताना आरक्षणासंबंधीच्या सगे-सोयरेच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन मराठा समाज हातातून जाऊ देऊ नये. मराठा समाजाचा रोष सरकारने घेऊ नये असेही जरांगेंनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षण, आमच्या व्याख्याप्रमाणे सगे-सोयरे कायद्यांची अंमलबजावणी करणे, हैद्राबादसह विविध संस्थाचे गॅजेट स्विकारणे, जात प्रमाणपत्र वाटप चालू करणे,गुन्हे वापस घेणे,मुलीना मोफत शिक्षण लागू करणे,मुलींची फी माफ करणे व समाजाला त्रास देणे थांबवणे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे मराठवाड्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) जनजागृती शांतता रॅली काढणार आहेत. या रॅलीची सुरुवात हिंगोली जिल्ह्यापासून होणार आहे.

आम्ही शांततेत या रॅलीचे आयोजन करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांना त्याकरिताच वेळ वाढवून दिला. ते नक्कीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील, अध्यादेश काढतील अशी खात्री आहे. जनजागृती रॅलीला गालबोट लागणार नाही. सरकारने याबाबत लक्ष ठेवावे. गालबोट लागले तर त्याची जबाबदारी सरकारची असणार आहे अशी भूमिकाही जरांगे पाटील यांनी यावेळी मांडली.

जरांगे पाटील म्हणाले, आम्ही जातीय तेढ निर्माण करत नाही.ओबीसी व आमच्यात कोणताही वाद नाही. संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. दोन्ही समाजाने शांतता पाळावी असेही जरांगे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस सांगतात, आम्ही आरक्षण दिले, सारथी संस्थेला व महामंडळाला निधी दिला.परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावे. शिक्षणाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, असे सरकारने सांगितले. मुलींना मोफत शिक्षणही मिळत नाही, फी भरावी लागत आहे. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळत नाही.10 टक्के आरक्षण दिले तरीही त्याचा उपयोग सध्या होताना दिसून येत नाही. पोलिस भरतीला मुदतवाढ देणार होते, तीही मिळत नाही याकडे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष द्यावे असे जरांगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT