Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarane : 'या' एका शब्दानं सरकारची तंतरली; मनोज जरांगेंनी सांगितला किस्सा

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मराठा आरक्षणावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात सरकारला मराठा आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे.

त्यावेळी जरांगेंनी काही मतदारसंघात जात 'पाडा' असा शब्द वापरल्याचा आरोप होत आहे. मात्र या 'पाडा' शब्दावरून काही मंत्र्यांची झोप उडाली आहे, असा टोला मनोज जरांगेंनी हिंगोलीत बोलताना लगावला.

आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. मात्र मराठा Maratha आंदोलनाची धग काही कमी झाली नाही. आंदोलक मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी 13 जुलैपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तत्पुर्वीच आरक्षणासाठी जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी मराठवाड्यातून शांतता यात्रा सुरू केली असून तेथे त्यांची शनिवारी पहिली सभा पार पडली. यावेळी त्यांनी सरकार, छगन भुजबळांसह इतर ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल केला.

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसला आहे. त्यावेळी आंदोलक मनोज जरांगेंनी Manoj Jarange काही मतदारसंघात जाऊन इशारा दिला होता. त्यामुळे संबंधित उमेदवारांचा लोकसभेत पराभव झाल्याची चर्चा आहे. यावरून आता सरकारमधील काही मंत्री 'पाडा' हा शब्द वापरू नका असे सांगत असल्याचे जरांगेंनी सांगितले. ते म्हणाले, 'काही मंत्री येतात आणि कानात सांगतात की तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा फक्त 'पाडा' म्हणू नका. आमच्या छातीत धस्स होते. '

या एका शब्दाने तुमची मोठी फजती झालेली आहे. आता जर मराठ्याने नाव घेतले तर तुमच्या नावापुढे मतदानच होणार नाही, असा इशारा देत जरांगेंनी आम्हाला राजकारणाचे काही देणे घेणे नाही. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. आम्हाला राजकारण करायची अजिबात इच्छा नाही. मात्र तुम्ही जर आम्हाला राजकारणात ओढले तुमच्या होणाऱ्या फजितीस तुम्हीच कारणीभूत असाल, असा इशाराच सरकारला दिला आहे.

माझे स्वप्न आहे नेते तुमच्या चपलासकट तुमच्या पाया पडले पाहिजेत. तुमच्या मताला किंमत दिल्याशिवाय कोणताच नेते पुढे गेला नाही पाहिजे. या मताची पॉवर ही मराठ्यांच्याच हातात राहिली पाहिजे. हे आता मराठ्यांनी सिद्ध केले आहे. आता आरक्षण दिले नाही तर राज्यातील मराठ्यांची बैठक घेऊन 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे हे ठरवू. जो काही निर्णय ठरला तर मागे सरायचे नाही, असेही जरागेंनी निर्धार केला.

ओबीसी नेत्यांना इशारा

ओबीसीचा जो नेता मराठ्यांच्या विरोधात काम करेल. गोर गरिबांना त्रास देईल, त्याला या निवडणुकीत पाडायचा म्हणजे पाडायचाच. त्याला कधीच निवडून येऊ द्यायाचा नाही. आपल्या तोंडातून निघालेला शब्द मागे घेणार नाही. राज्यातील तो कितीही मोठा नेता असो त्याला पाडायचा म्हणजे पाडणार. लोकसभेत ज्याची खुमखुमी जिरली नसेल तर त्याची विधानसभेत जिरणार म्हणजे जिरवणार, असाही टोला जरांगेंनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT