Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : छत्रपती संभाजीनगरात शनिवारी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी!

Jagdish Pansare

Manoj Jarange Patil at Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरपारच्या लढाईसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांची महाशांतता रॅली 13 जुलै रोजी संभाजीनगरात होणार आहे. मराठा क्रांती मोर्चानंतर पुन्हा एकदा संभाजीनगरात मराठ्यांचे वादळ धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात सुरू केलेले शांतता संवाद रॅलीचा समारोप आणि मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरणार आहे.

या शांतता रॅलीची जोरदार तयारी मराठा समाज बांधवांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने या शांतता रॅलीसाठी आवश्यक उपाययोजना केल्याची माहिती आहे. शहरातील प्रमुख रस्ता असलेला जालना रोड 13 जुलै रोजी बंद ठेवावा, अशी मागणी आयोजकांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात असे त्यांना सांगण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत पाचशे स्वयंसवेक, अडीचशे ट्रॅक्टर अन् 10 ॲम्ब्युलन्स असणार आहेत. सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते क्रांती चौक पर्यंत ही रॅली निघणार आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.

रॅलीच्या मार्गावर सहभागी समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक, ॲम्ब्युलन्स, फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत. लाखोच्या संख्येने समाज बांधव जिल्हाभरातून या रॅलीत सहभागी होण्यासाठी एकवटणार आहे. या सर्वांसाठी चहा, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था रॅली मार्गावर करण्यात आली आहे. तसेच, पोलिस प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेत बदल केला जाणार आहे. सकाळी अकरा वाजता रॅलीला सुरुवात होऊन सायंकाळी पाच वाजता क्रांती चौक येथे समारोप होईल.

क्रांती चौक येथे भव्य स्टेज उभारण्यात येणार आहे. विविध गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बैठका घेत आहेत. पाच- सहा ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पैठण तालुक्यातून येणाऱ्यांसाठी बीड बायपास रोडवरील जबिंदा मैदान, कन्नड, खुलताबाद, वैजापूर, गंगापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी कर्णपुरा, अयोध्या मैदान येथे, तर फुलंब्री आणि सिल्लोड येथील समाज बांधवांची वाहने जाधववाडी (नवा मोंढा) येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जालन्याकडून येणारी वाहने चिकलठाणा एमआयडीसीतील वाहनतळावर पार्क करण्याची व्यवस्था असेल. कोणाला उपचाराची गरज भासली तर अत्याधुनिक 10 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यात तज्ज्ञ डॉक्टर आणि अनुभवी नर्स औषधोपचारासह सज्ज असतील. या रॅली दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत ठप्प होणार आहे.

या मार्गावरील वाहतुक वळवण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांनी आज आयोजकांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. रॅलीत सहभागी प्रत्येक व्यक्तीने शिस्त पाळावी आणि शांततेत सहभाग नोंदवावा, यासाठी रॅली मार्गावर अडीचशे ठिकाणी लाऊडस्पीकरवरून आवाहन केले जाणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT