Ajit Pawar, Eknath Shinde, Dhananjay Munde, Devendra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : परळीतील कार्यक्रमापूर्वी मराठा आंदोलकांच्या 'शासन गो बॅक' च्या घोषणा अन् बसही रिकाम्या पाठवल्या

Datta Deshmukh

Beed News : शिंदे सरकारमधील वजनदार मंत्री धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या परळीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला अखेर आज (ता.5 डिसेंबर) मुहूर्त लागला. वेगवेगळ्या कारणांमुळे या कार्यक्रमाला तब्बल चार ते पाच महिने केवळ 'तारीख पे तारीख'च मिळत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या मुंडे यांच्या कार्यक्रमालाच उशीर झाल्याने राजकीय वर्तुळात हा मुद्दा चर्चेचा ठरला होता.

एकीकडे धनंजय मुंडे यांनी यासाठी पूर्ण ताकद पणाला लावलेली असतानाच कार्यक्रमासमोरील आव्हाने कमी होताना दिसत नव्हते. याचवेळी मंगळवारी होत असलेल्या या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलकांनी ‘शासन गो बॅक’च्या घोषणा दिल्या आणि त्यामुळे बसही रिकाम्या गेल्याचे चित्र दिसून आले.

या कार्यक्रमासाठी अख्ख्या जिल्ह्याचे प्रशासन तयारीसाठी परळीत तळ ठोकून आहे. परंतु, काही गावांमध्ये मराठा आरक्षण आंदोलकांनी विरोध केल्यामुळे रिकाम्या बस पाठवण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.

'शासन आपल्या दारी' (Shasan Aaplya Dari) कार्यक्रमासाठी प्रशासनाबरोबरच राजकीय यंत्रणेनेही जय्यत तयारी केली होती. कार्यक्रम परळीत व्हावा, यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आणि त्याला यशही आले. गर्दी जमा करण्यासाठी परंतु, लाभार्थींना आणण्यासाठी गेलेल्या बस रिकाम्या परतल्याचा प्रकारही काही गावांत घडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे धनंजय मुंडे (Dhananjay Muunde) यांच्या परळी मतदारसंघातील नागापूर येथे 'शासन गो बॅक' अशा घोषणा मराठा आरक्षण आंदेलकांनी दिल्या. त्यानंतर गावातून लाभार्थी नेण्यासाठी आलेल्या दोन बस रिकाम्या परळीकडे रवाना झाल्या.

परळीत होत असलेला कार्यक्रम भव्य - दिव्य करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. लाभार्थीची ने - आण, अलिशान मंडप, हार तुऱ्यांसाठी शासन तिजोरीतून जिल्हा नियोजन समितीमधून पाच कोटींचा खर्च झाला आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी लाभार्थी आणण्यासाठी तब्बल 580 बसची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी साधारण दीड कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

मंगळवारच्या कार्यक्रमासाठी सोमवारी रात्रीच तालुका निहाय बस पोचल्या होत्या.मंगळवारी सकाळी गावोगावी या बस पोहोचल्या.अशाच दोन बस परळी तालुक्यातील व याच मतदारसंघातील नागापूरला पोहोचल्या. मात्र, यावेळी मराठा आरक्षणातील आंदोलकांनी ‘शासन गो बॅक’ अशा घोषणांना सुरुवात केली. खूप वेळ थांबूनही बसमध्ये चढण्यासाठी लाभार्थीच आला नाही. त्यामुळे MH - 14 - 2048 व MH - 20 - 2256 या दोन्ही बस रिकाम्या परळीकडे रवाना झाल्या.

या उपक्रमासाठी परळीत आलेल्या मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar) यांनी गोपीनाथगडावर जाऊन दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

नांदेडहून हे चार नेते हेलिकॉप्टरने परळीला पोचले. परळीला पोचल्यानंतर नेत्यांचा ताफा अगोदर परळी जवळील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील गोपीनाथ गडावर पोचला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीस्थळावर फुले वाहून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी अभिवादन केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT