Manoj Jarange Mumbai Morcha Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Morcha: मनोज जरांगेंच्या पदयात्रेत गोदाकाठच्या 123 गावांची ताकद दिसली...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar: अंतरवाली सराटी गावातून मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या मराठा आरक्षणाचा वणवा आता राज्यभर पोहचला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गोदाकाठच्या 123 गावांच्या पाठबळावर सुरू केलेला मराठा आरक्षणाचा लढा आता राज्यातील प्रत्येक गरजवंत मराठ्यांचा झाला आहे. सात महिन्यापासून सुरू असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन अंतरवाली सराटीतून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे.

एखादे आंदोलन सलग पाच-सहा महिने सुरू ठेवणे, तेही सरकारचा दबाव असतांना ही सोपी गोष्ट नव्हती. सभा, दौरे, बैठका, उपोषण आणि पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या हजारो समर्थकांना सांभाळणे ही कसरत मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या या लढ्यामागे खंबीरपणे उभी राहिलेली गोदाकाठची 123 गावे गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे अनेक डाव याच गावांनी हाणून पाडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अगदी जालना येथे झालेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील यांनी 123 गावांपैकी किती गावातून पैसे जमा केले, कुठे खर्च केले, शिल्लक किती आणि आणखी कुठल्या गावातून पैसे जमा झालेत, पण ते वापरले नाहीत, हेही आकडेवारीसहीत सांगितले होते. माझ्या आंदोलनासाठी कुणी पैसे मागितले तर ते देऊ नका, हा लढा आम्ही गावागावत वर्गणी गोळा करून लढत आहोत, हे मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतात.

त्यामुळे लाखोंच्या सभा, मेळावे, बैठका, राज्यभराचे दौरे होऊनही मराठा आरक्षणाला डाग लागला नाही, हे जरांगे पाटील आणि गोदाकाठच्या एकशे तेवीस गावांमधील शिष्टमंडळाचे यशच म्हणावे लागेल. मुंबईकडे पदयात्रेणे जाण्याची जरांगे यांनी केलेल्या घोषणेच्या निर्णयातही याच गावांची भूमिका महत्वाची ठरली. याच गावातून कधी, कसे, कोणत्या मार्गाने, किती वेळात मुंबईला पोहचायचे याचे नियोजन ठरले.

वाहने, गाड्या, अन्नधान्यासह एखादे बिऱ्हाड हलवतांना जी तयारी करावी लागते, अगदी तशी तयारी आणि नियोजन गावकऱ्यांनी केले. अंतरवालीतून काल जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघाली तेव्हा तीन ते चार हजार लोक होते. पण जसजशी ही पदयात्रा मुख्य रस्त्याला लागली तशी ही गर्दी वाढायला सुरूवात झाली.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा आणि हातात भगवे झेंडे घेऊन मराठा बांधव, महिला आणि लहान मुले असे न भुतो न भविष्यती असे चित्र दिसत होते. मातोरी या जरांगे पाटील यांच्या मुळगावी मुक्कामाची केलेली चोख व्यवस्था, जेवण आणि वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था या नियोजनात समस्त मराठा समाज बांधवांसोबत गोदाकाठच्या गावांचीही महत्वाची भूमिका होती.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT