Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservstion : 'आधी फडणवीसांनी अन् आता शिंदेंनी मराठा समाजाला..' ; रावसाहेब दानवेंचं विधान!

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनास अखेर शनिवारी यश आलं. मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अधिसूचनेची प्रत लाखो मराठाबांधवांच्या साक्षीने जरांगे-पाटील यांना दिली. यामुळे मराठा समाजात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहेत. तर सरकारच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे म्हणतात, 'मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पहिल्यापासून भाजपची आणि आमच्या सरकारची भूमिका राहिली आहे. याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयात ते टिकवूनही दाखवले. पण नंतरच्या महाविकास आघाडीला ते सर्वोच्च न्यायलायत टिकवता आले नाही. आता पुन्हा राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मी मराठा समाजाचं आणि मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो.' (Raosaheb Danve on Maratha Reservstion)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्ली येथे माध्यमांशी बोलतांना काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेलाही दानवे यांनी आपल्या शैलीत प्रत्त्युतर देत त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही, असे म्हटले आहे. तसेच 'मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाले आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी स्वतः जरांगे पाटील यांना या संदर्भात पत्र दिले आहे.'

याचबरोबर 'ओबीसी किंवा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत मनोज जरांगे पाटील व मराठा आंदोलकांना शब्द दिला होता, तो त्यांनी आज पूर्ण केला. आता अध्यादेशाचे कायद्यात रुपातंर करण्याआधीची जी कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पूर्ण केली जाईल. हरकती मागवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा एक भागच आहे.' असंही रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) म्हटलं आहे.

त्यामुळे काँग्रेस किंवा विरोधकांकडून केली जाणारी टीका तथ्यहीन आहे. मराठे लढाई जिंकले, पण तहात हरले असे म्हणणाऱ्यांनी ते काय हरले किंवा सरकारने काय चुकीचे केले? हे दाखवून द्यावे, असे आव्हानही दानवे यांनी दिले. काँग्रेसला तर मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही.

महाराष्ट्रात कित्येक वर्ष काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर होते. अनेक मुख्यमंत्री त्यांचे होऊन गेले, पण मराठा आरक्षणावर त्यांनी कधीच भूमिका घेतली नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण(Ashok Chavan) हे स्वतः मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. मग त्यांनी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काय केले? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उपस्थीत केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT