Imtiaz Jaleel- Chandrashekar Azhad Party Meeting News Sarkarnama
मराठवाडा

Aimim News : एमआयएमकडून पुन्हा 'जय भीम, जय मीम'चा नारा! भीम आर्मीसोबतच्या युतीने मतांचे गणित जुळणार का ?

AIMIM brings back the 'Jai Bhim, Jai Meem' slogan as part of its strategy to consolidate Dalit-Muslim votes ahead of upcoming municipal elections. : इम्तियाज जलील यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुणी आमच्यासोबत येत असेल तर निश्चित विचार करू, असे म्हणत आगामी युतीचे संकेत दिले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : एमआयएमने 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी करत जयभीम, जयमीमचा नारा दिला होता. लोकसभा निवडणुकीत या युतीचा फायदा एमआयएमला झाला, पण वंचितचे प्रकाश आंबेडकर दोनही लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले. यातून धडा घेत नऊ महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितने एमआयएमची साथ सोडली. तेव्हापासून म्हणजे सहा वर्षापासून एमआयएम नव्या मित्राच्या शोधात आहे.

भीम आर्मीचे खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांच्या आझाद समाज पक्षाशी एमआयएमने (AIMIM) बोलणी सुरू केली आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या घरी दोन दिवसांपुर्वी आझाद समाज पक्षाच्या प्रभारींची बैठक होऊन प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. महाराष्ट्रात, मराठवाड्यात अन् छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रशेखर आझाद रावण यांची क्रेझ असली तरी त्यांचा पक्ष अद्याप फारसा कोणाला माहित नाही. केवळ आझाद यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर शहरातील 16 टक्के आंबेडकरी समाज त्यांच्यासोबत जाईल का? हा खरा प्रश्न आहे.

आगामी महापालिका निवडणुकीचा (Municipal Corporation) विचार केला तर मुस्लिम आणि आंबेडकरी समाजाच्या मतांचा आकडा हा टक्केवारीत तब्बल 47 टक्के असल्याचे लक्षात येते. म्हणजेच निम्मे मतदार हे या दोन समुदायाचे आहेत. 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या जोरावर 25 नगरसेवक निवडून आणले होते. आता हा आकडा 30 ते 40 पर्यंत नेऊन सत्तेच्या पतंगाची दोर आपल्याकडे ठेवण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांना आंबेडकरी समाजाची साथ लागणार आहे.

वंचितने 2019 मध्येच साथ सोडल्यामुळे 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत एमआयएमला फटका बसला आहे. स्वत: इम्तियाज जलील व त्यांच्या पक्षाचा एक उमेदवार पराभूत झाला. महापालिका निवडणुकीत गेल्या वेळचे संख्याबळ राखत किंगमेकर होण्यासाठी एमआयएमला आंबेडकरी समाजाची मतं मिळणं गरजेचं आहे. वंचितला पर्याय म्हणून एमआयएमने खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाला साद घातली आहे. इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी खासदार चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली होती. त्यात त्यांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर आता आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्राचे समन्वयक गौरी प्रसाद उपासक यांनी छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांची भेट घेतली. यात आगामी युतीबाबत आणखी गांभीर्याने चाचपणी झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत उपासक यांनी स्पष्ट बोलत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे सांगितले. तर इम्तियाज जलील यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुणी आमच्यासोबत येत असेल तर निश्चित विचार करू, असे म्हणत आगामी युतीचे संकेत दिले. आंबेडकरी मतांसाठी महाराष्ट्रातील दलित पक्ष संघटनांऐवजी चंद्रशेखर आझाद यांच्याशी युती केल्यास फायदा होऊ शकतो, असा एमआयएमचा कयास आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत मुस्लिम मतदान 31 टक्क्यांच्या आसपास आहे, तर दलित मतदान 16 टक्के. 115 वॉर्डांपैकी 30 वार्ड मुस्लिम बहुल आणि 18 दलितबहुल आहेत. त्यामुळे 48 वॉर्डांत दलित आणि मुस्लिम यांचे प्राबल्य आहे. अशा स्थितीत हे दोन्ही समाज एकत्र आले तर दोन शिवसेना आणि भाजप असे तिघांत विभाजन होण्याची शक्यता असल्याने हे नवीन गणित महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT