Assembly Session News : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संबंधित हाॅटेल व्हिट्स खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण काल विधान परिषदेत गाजले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब, काँग्रेसचे भाई जगताप यांनी महसूल मंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना जाब विचारला. मुख्यमंत्र्यांनी आरोप तर फेटाळले पण या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावली.
यावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मुख्यमंत्र्यांना संजय शिरसाट यांच्यावर करण्यात आलेल्या वर्ग दोनची सरकारी जमीन, एमआयडीसीतील भूखंड प्रकरणाची चौकशी कधी करणार? असा सवाल केला. तसेच भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा, असा टोलाही सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. संजय शिरसाट यांच्यावर बेकायदा मालमत्ता खेरदी प्रकरणी आरोप करत इम्तियाज जलील यांनी हे प्रकरण लावून धरले आहे.
हाॅटेल व्हिट्स खरेदी प्रक्रिया, सरकारी वर्ग दोनची जमीन शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपल्या कुटुंबियांच्या नावे खरेदी केली, शेंद्रा एमआयडीसीतील आरक्षित भूखंड आरक्षण बदलून खरेदी करणे, शहरात मोक्याच्या ठिकाणी प्लाॅट व शहरालगत पंधरा एकर जमीन खरेदीचे आरोप करत इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून दिली होती. या सगळ्या प्रकरणांची कागदपत्र त्यांनी ईडी, सीबीआय, अॅन्टीकरप्शन, आयकर विभागाला देऊन चौकशीची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांकडेही त्यांनी या संदर्भात भेटीसाठी वेग मागितली होती. त्यानंतर काल विधीमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेत हाॅटेल व्हिट्स खरेदी-विक्री प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी सरकारने त्यांच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे.
VITS प्रकरण बाहेर आले आहे पण गरीब दलितांसाठी असलेली श्रेणी दोनची जमीन हडप करण्यासाठी वापरल्या गेलेल्या बेकायदेशीर मार्गांचे काय? ही जमीन तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या मदतीने कुटुंब कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबाच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच MIDC जमीन हा आणखी एक मोठा घोटाळा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराविरुद्ध आहेत हे कृतीतून दाखवतील, अशी आशा असल्याचे इम्तियाज जलील यांनी 'एक्स'वर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
मराठी माणसांनी बळी पडू नये..
दुसरीकडे राज्यात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा वाद चिघळला आहे. यावरही इम्तियाज जलील यांनी मराठी माणसांना उद्देशून महाराष्ट्रीय मराठी लोकांनी भाजपच्या राजकारणाला बळी पडू नये. वादग्रस्त आणि निराधार विधाने करण्याची सवय असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद असलेले निशिकांत दुबे मराठी लोकांना हिंसाचारात सहभागी होण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून त्याचा फायदा त्यांच्या भाजप पक्षाला सोयीस्करपणे होईल, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी सुनावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.