uddhav thackeray, Nagesh Aashtikar  sarkarnama
मराठवाडा

Hingoli Lok Sabha Exit Poll 2024 : हिंगोलीत शिंदेंचा डाव फसला; ठाकरेंचे आष्टीकर बाजी मारणार

Sachin Waghmare

Exit Poll 2024 : : हिंगोली लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याचा डाव फसला आहे. हिंगोली मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी बाजी पलटावली असून येथील चित्र बदलावत आघाडी घेतली आहे.

महायुतीची भक्कम ताकद पाठीमागे असलेल्या बाबूराव कदम-कोहळीकार यांच्या रूपाने नवा चेहरा दिला होता. मात्र, दुसरीकडे फोडाफोडीचे राजकारण कुणालाही पटले नसल्याचा फटका बसला आहे. 'पोल ऑफ पोल'ने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांना आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. (Hingoli Lok Sabha Exit Poll News)

हिंगोलीत शिंदे गटाचे बाबूराव पाटील कोहळीकर आणि ठाकरे गटाचे नागेश पाटील-आष्टीकर यांच्यात लढत झाली. आतापर्यंत युतीविरुद्ध आघाडी असे लढतीचे चित्र होते. परंतु यावेळी पहिल्यांदाच दोन शिवसैनिक आमने-सामने उभे ठाकले. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक ओळखणारी ही निवडणूक मानली जात होती.

सुरुवातीला मतदारसंघातील भाजपचे प्राबल्य, शिंदे गटाचे एक आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार हे चित्र पाहता या मतदारसंघात महायुतीचेच पारडे जड मानले जात होते. या मतदारसंघात खासदार अशोक चव्हाण यांना मानणारा वर्गही मोठा आहे. एवढी मोठी शक्ती एकवटलेली असताना महाविकास आघाडीचा उमेदवार कितपत टिकेल, असा प्रश्न उपस्थित होत होता.

ठाकरे गटाने निवडणूक रंगात येण्याअगोदर सभा घेऊन वातावरण निर्मिती केल्याने ठाकरे गटात उत्साह संचारला होता. परंतु शिंदे गटासह महायुतीपुढे ठाकरे गट टिकाव धरणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. निवडणूक प्रचार रंगात आलेला असतानाच ऐनवेळी विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कडाडून विरोध केला. एवढेच नव्हे, तर उमेदवार बदलण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणला. त्यातच रामदास पाटील सोमठाणकर यांनी बंडखोरीचा इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचा आक्रमक पवित्रा पाहता शिंदे गटाने थेट विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर सच्चा शिवसैनिक म्हणून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली आणि हेमंत पाटील (Hemant Patil) नाराज होऊ नयेत, म्हणून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळमधून उमेदवारी देऊन दुहेरी वाद ओढवून घेतला होता .

मुख्यमंत्री शिंदे यांचा डाव फसला आणि मतदारसंघातील चित्रच बदलून गेले. परंतु महायुतीची भक्कम ताकद, बाबूराव कदम यांच्या रूपाने नवा चेहरा दिल्याने या महायुतीच्या जमेच्या बाजू समजल्या जात होत्या. मात्र, यावेळेस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नागेश पाटील-आष्टीकर यांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT