K Chandrashekhar Rao Sarkarnama
मराठवाडा

Nanded Political News : नांदेडला 'बीआरएस'साठी आगामी काळ कसोटीचा...

Laxmikant Mule

Nanded Political News : नुकत्याच झालेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाचा पराभव झाला. काँग्रेसने दहा वर्षांनंतर येथे कमबॅक केले आहे. बीआरएसच्या पराभवाचा परिणाम नांदेडसह मराठवाड्यातील पक्षविस्तारावर होणार आहे. सत्ता असताना नांदेड मार्गे राज्यातील राजकारणात शिरकाव करण्यासाठी बीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सभांचा धडाका लावला होता.

या सभांमुळे वातावरण निर्मिती झाली होती, पण आत्ता सत्ता गेल्याने आपल्या गृहराज्यासह इतर राज्यात पक्षवाढीसाठी संघर्ष करावा लागणार असल्याने येणारा काळ पक्षासाठी कसोटीचा ठरणार आहे. नांदेड Nanded जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा Telangana राज्याला लागून आहेत. सीमावर्ती भागात मराठी व तेलुगू भाषा बोलली जाते, तसेच या भागात रोटी-बेटी व्यवहार केला जातो.

त्यामुळे भौगोलिक स्थान व सामाजिक संबंध लक्षात घेऊन एमआयएमने महाराष्ट्रातील पक्षवाढीसाठी नांदेडची निवड केली होती. याचा फायदा एमआयएमला झाला. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक निवडून आले व राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधून घेतले होते. हाच कित्ता गिरवत बीआरएस देशव्यापी जनाधार मिळवण्यासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव K. Chandrashekhar Rao यांनी आपली महाराष्ट्रातील पहिली सभा नांदेड शहरात घेतली.

या सभेची खूप मोठी चर्चा झाली. या सभेनंतर मराठवाड्यासह राज्यांतील विविध शहरांमध्ये सभा घेऊन गुलाबी वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. बीआरएसच्या गुलाबी स्वप्नाची भुरळ राज्यातील माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडली व या पक्षांत प्रवेश केला. तेव्हाच्या परिस्थिती‌त व‌ आत्ताच्या परिस्थितीत खूप मोठा फरक झाला आहे. तेलंगणाची सत्ता राहिली नाही, सत्ता असली की पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा घोळका राहतो.

सत्ता गेली की कार्यकर्त्यांचा ओघ कमी होतो. राज्यातील जे पदाधिकारी व कार्यकर्ते या पक्षांत आले आहेत, त्यांना पक्षांत कायम ठेवण्यासाठी राव यांना प्रयत्न करावा लागणार आहे. तसेच गृहराज्यात व महाराष्ट्रात संघर्ष करावा लागणार आहे. सत्ता नसताना पक्षवाढीसाठी काम करणे खूप अवघड असते. येणारा काळ हा या पक्षासाठी कसोटीचा व संघर्षांचा राहणार आहे. नांदेड जिल्ह्यात या पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी या पक्षात प्रवेश केला आहे. माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे यांनी मोठी सभा घेऊन पक्षप्रवेश केला होता. तसेच सीमावर्ती भागातील गावांनी तेलंगणा राज्यांत जाण्याचा ठरावदेखील केला होता, पण आत्ता परिस्थिती बदलली आहे. बीआरएसची सत्ता राहिली नाही, त्यामुळे जिल्ह्यात पक्षवाढीसाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT