Marathwada Political News : मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा जालना- नांदेड या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावरून सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. गेल्या आठवड्यात नांदेड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सरकारकडे पैसे नसल्याने आम्ही भूसंपादनाचे काम थांबवल्याचे सांगितले. इतकेच नाही तर मार्ग निघाला नाही, तर हा रस्ताच रद्द करणार आहोत, असे स्पष्ट केले.
तर दुसरीकडे मुंबईत सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने जालना-नांदेड द्रुतगती मार्गासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दालनात नुकतीच बैठक पार पडली. भूसंपादनासह या महामार्गाच्या अंमलबजावणी व इतर प्रश्नावर यावेळी चर्चा करण्यात आली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती मार्गाच्या भूसंपादना संदर्भात अनेक तक्रारी आहेत.
योग्य मोबदला मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच आमच्या मागण्याचा विचार झाला नाही तर आम्ही जमीनी देणार नाही, अशी भूमिका या महामार्गात जमीन बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली. (Ajit Pawar) यावर योग्य मार्ग काढून प्रकल्पाला वेग देण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार अर्जुन खोतकर, हेमंत पाटील, बाबुराव कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना आणि एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
जालना-नांदेड द्रुतगती मार्ग समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, ज्यामुळे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग अधिक प्रभावीपणे कार्यान्वित होईल. या प्रकल्पामुळे जालना आणि नांदेड या दोन शहरांमधील 226 किलोमीटरचे अंतर 179.8 किलोमीटरपर्यंत कमी होऊन मुंबई आणि नांदेड दरम्यानचा 12 तासांचा प्रवासही निम्म्यावर येण्याची अपेक्षा आहे.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या जमिनींच्या भूसंपादनाशी संबंधित मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली, ज्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना निश्चित केल्या गेल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कल्पनेतून आकारास आलेल्या तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाच्या मावेजाच्या विषयात असंख्य तक्रारी आहेत.
या तक्रारी घेऊन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने 1 मार्च रोजी नांदेड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. मात्र त्यांचे समाधान करण्याऐवजी महामार्गासाठी शासनाकडे पैसा नाही, आम्ही ते काम थांबवलेले आहे. गरज पडल्यास रस्ताही रद्द करू, असा इशारा दिला होता. आता त्याच महामार्गाला वेग देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नांदेड आणि जालना जिल्ह्यातील आमदार प्रयत्न करत आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.