Marathwada Political News : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जालना-नांदेड हा समृद्धी महामार्गाला जोडला जाणार द्रुतगती महामार्ग निधी अभावी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनीच या संदर्भात संकेत दिले आहेत. शुक्रवारी नांदेड दौऱ्यावर असतांना या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेऊन योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार केली होती.
यावर निधी अभाव या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाचे काम थांबवण्यात आल्याचे अजित पवारांनी या शिष्टमंडळाला सांगितल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासंदर्भात काही निर्णय झाला तर ठीक अन्यता हा प्रकल्पच बंद करावा लागेल, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी स्पष्ट केल्याची सुत्रांची माहिती आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या पक्ष प्रवेशासाठी अजित पवार शुक्रवारी नांदेडमध्ये आले होते. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील निवासस्थानी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेतली होती.
महामार्गाच्या भूसंपादना संदर्भातील अनेक तक्रारी प्रलंबित आहेत, आम्हाला योग्य मोबदला मिळावा अन्यथा हा प्रकल्प थांबवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी अजित पवारांकडे केली. शिष्टमंडळाचे ऐकून घेतल्यावर अजित पवारांनी प्रकल्पा संदर्भातील वस्तुस्थिती मांडली. (Ashok Chavan) या महामार्गासाठी शासनाकडे निधी नसल्याने सध्या भूसंपादनाचे काम थांबवल्याचे त्यांनी सांगितले. काही मार्ग निघाला नाही तर हा प्रकल्पच रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी संपर्क साधला परंतु तो होऊ शकला नाही.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीच हा प्रकल्प रद्द करण्याचे संकेत दिल्यामुळे अशोक चव्हाण याचा ड्रीम प्रोजेक्ट ड्रीमच ठरणार, असे दिसते. महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यातील जालना-परभणी-हिंगोली-नांदेड या मार्गासाठीचा प्रस्ताव दिला होता. मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीकडून मंजूरी मिळाल्यानंतर 8 मार्च 2021 मध्ये अर्थसंकल्पात प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. 7 सप्टेंबर 2021 मध्ये शासन निर्णय झाला आणि मे 2024 मध्ये या प्रकल्पासाठीच्या निविदा उघडण्यात आल्या होत्या.
जालना -नांदेड एक्सप्रेसवे हा एक लिंक रोड ग्रीनफील्ड प्रकल्प आहे जो मराठवाड्यातील जालना , परभणी आणि नांदेड शहरांना मुंबई-नागपूर एक्सप्रेसवे म्हणजेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडतो. सहा पदरी रुंदीचा हा विभाग जालना आणि नांदेडमधील रस्त्याचे अंतर 226 किलोमीटरवरून 179 किलोमीटरपर्यंत कमी करेल आणि नांदेड आणि मुंबईमधील प्रवासाचा वेळ 12 तासांवरून सुमारे 6 तासांपर्यंत कमी करेल.
जालना-नांदेड एक्सप्रेस वे थेट जालना ,परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमधून जाईल . 179 किलोमीटर लांबीचा जालना-नांदेड विभाग 87 गावांमधून जातो. या विभागातील सुमारे 93.52 किलोमीटरचा भाग परभणीतील चार तालुक्यांमधून जातो, तर 66.46 किलोमीटरचा भाग जालन्याच्या तीन तालुक्यांमधून जातो आणि 19.82 किलोमीटरचा भाग नांदेडमधील एका तालुक्यातून जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.