Ashok Chavan, Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha Election 2024 : नांदेडमध्ये 'मशाल' पेटवण्याची हीच खरी वेळ; उद्धव ठाकरे लक्ष देतील का?

Laxmikant Mule

Nanded : राजकारणात संकट म्हणजे एक नवीन संधी, असे नेहमीच म्हटले जाते. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे अडचणीत आले. पक्ष गेला, नाव गेले, चिन्हही गेले, पण जनतेची सहानुभूती पाठीशी असल्याने ठाकरे पुन्हा मैदानात उतरले आहेत. कधीकाळी नांदेड जिल्ह्यात चार - चार आमदार निवडून आणण्याची ताकद असलेल्या ठाकरे गटाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याची संधी चालून आली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था नाजूक स्थितीत पोहोचली आहे. अनेकांना अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा हा निर्णय पटलेला नाही. परंतु सक्षम पर्याय समोर दिसत नसल्यामुळे त्यांना चव्हाण यांच्यासोबत फरपटत जाण्यावाचून दुसरा मार्ग नाही.

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांच्यासाठी पोषक मानली जाते. हीच ती खरी वेळ आहे, जेव्हा उद्धव ठाकरे आपली 'मशाल' नव्याने पेटवू शकतात. आता याकडे ठाकरे कसे पाहतात? यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत. जिल्ह्यात शिवसेनेची एकेकाळी मजबूत पकड होती. जिल्ह्यातून‌ चार आमदार निवडून यायचे. पण गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती राहिलेली नाही.

काँग्रेसची सूत्रे अशोक चव्हाण यांच्याकडे आल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्षांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागले. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस (Congress) मध्ये आता त्राण उरलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग नांदेड जिल्ह्यात आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी असलेली सहानुभूती, निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव पुन्हा एकदा मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात शिवसेनेने चांगले बस्तान बसवले होते. सत्ता नसतांनाही शिवसेनेला मतदारांनी भरपूर साथ दिली आहे. शिवसेना (Shivsena) जिल्ह्याच्या राजकारणात एक प्रमुख पक्ष झाला होता. पण गेल्या काही वर्षांत शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. महाविकास आघाडीत शिवसेना हा एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे संघटनात्मक पातळीवर बऱ्यापैकी काम आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांनी जिल्ह्यात सावरण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे हिंदूत्ववादी मतदारांत नाराजीचा सूर दिसून येत आहे. याचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला होऊ शकतो. काॅंग्रेसकडे सक्षम नेतृत्व राहिले नाही, ज्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये जाणे पसंत पडले नाही ते पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेला साथ देण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या मतदारांत अशोक चव्हाण यांच्या निर्णयाबद्दल सुप्त स्वरूपात नाराजी आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी नांदेडकडे लक्ष दिले व योग्य नियोजन करून संघटनात्मक पातळीवर काम केले तर शिवसेना उभारी घेऊ शकते. शिवसेनेत फूट पडल्यामुळे ठाकरे गटालाही नव्याने लक्ष घालावे लागेल. शिवसेना - भाजप युती असताना लोकसभेला हा मतदारसंघ भाजपकडे असायचा. यावेळी महाविकास आघाडीत नांदेडची जागा कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते त्यामुळे ही जागा काँग्रेस पक्ष लढणार हे गृहीत धरून महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी जिल्ह्यात फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र आता अशोक चव्हाण भाजपच्या गोटात गेल्याने महायुतीची ताकद दुपटीने वाढली आहे. अशावेळी नांदेडमधून महायुतीला आव्हान देण्याची ताकद फक्त ठाकरे गटात असल्याचे बोलले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ठाकरे गटाने नांदेड मधून लढण्याचा निर्णय घेत चाचपणी करायला हरकत नसल्याचीही चर्चा केली जाते.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT