laxman hake on raj thackeray Sarkarnama
मराठवाडा

Laxman Hake : 'तुम्ही खरेच प्रबोधनकारांच्या घराण्यात जन्मलात का?' लक्ष्मण हाकेंचा राज ठाकरेंना संतप्त सवाल

Rashmi Mane

राज ठाकरे "तुम्ही खरेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का? " असा संतप्त सवाल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल ते सोलापूरमध्ये असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील ओबीसी- मराठा आरक्षणाच्या संघर्षावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करत "महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचं" मोठं विधान केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर बोलतांना लक्ष्मण हाके यांनी "मला राज ठाकरे यांच्या विचारांची कीव येते" असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके?

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही टीकेची तोफ डागली आहे. 'ओबीसी आंदोलक म्हणून माझी विचारणा आहे की, या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींना एक टक्कासुद्धा बजेटमध्ये तरतूद होत नाही, इथल्या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीतली माणसं, व्हीजेएनटी अ आणि ब प्रवर्गातील माणसं, त्यांच्या शिक्षणाचं काय? त्यांच्या घराचं काय? त्यांच्या स्थिर होण्याचं काय? 'प्रबोधनकारांच्या घरी जन्म घेऊन राज ठाकरे बेजबाबदार आणि असंवैधानिक वक्तव्य करत आहेत, याची कीव करावीशी वाटते, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. 'महाराष्ट्र नावाने पार्टी चालवता आणि अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य करता, अशी संतप्त प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक स्वबळवर लढण्याची तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल ते सोलापूरात होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर फोकस केला आहेत.

आज त्यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी "त्यांनी महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही," असे मोठे विधान केलं होतं. त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन आणि ओबीसीमधील समावेशाच्या मागणीवरुन संघर्ष पेटला असतानाच राज ठाकरे यांनी हे विधान केल्यामुळे नवा वाद पेटला आहे.

मनोज जरांगे-पाटीलही राज ठाकरेंवर संतापले

ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही टीका केली आहे. "राज ठाकरे यांना काय जाब विचारायचा आहे? यांना आरक्षण म्हणजे काय आहे, हे त्यांना कधी कळणार नाही? हे गोरगरीब मराठ्यांच्या जिवाशी खेळणारे लोक आहेत. राज ठाकरे सुद्धा सत्तेचाच भाग आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात बोलण्यासाठी षडयंत्र रचलं आहे. श्रीमंत राजकारणी लोकांना गोरगरीब मराठ्यांचा प्रश्न कळणार नाही. कारण, हे श्रीमंतीत जगणारे आणि पैशांच्या गादीवर झोपणारे लोक आहेत. कुणालाही किंमत द्यायची नाही. कुणाला कशाला जाब विचारायचा? त्यांच्या कशाला पाया पडायला जायचं? त्यांच्या तोंडासमोर सुद्धा उभे राहायचं गरज नाही. सगळ्यांनी शांत राहायचं," असं आवाहन जरांगे-पाटलांनी आंदोलकांना केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT