Om Prakash Rajenimbalkar, Ranajagjitsinha Patil Sarkarnama
मराठवाडा

Om RajeNimbalkar: ओमराजे म्हणाले; 'आमदार, मंत्री केलं तरी माणसं फुटली'

सरकारनामा ब्युरो

शितल वाघमारे

Dharashiv News : काही जणांना शरद पवारांनी चाळीस वर्षे सांभाळले. ती माणसं आता काय या पक्षाचं सरकार येत नाही. आपल्याला काय मंत्री होता येत नाही. आपण जी काळे कारनामे केले ते आता हे सगळं उघडकीला आणते काय की ? या भावनेतून कोणत्याही क्षणाचा विचार न करता टुणकन राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेली मी पाहिली. ज्या पक्षप्रमुखांनी आमदार केलं, मंत्री केलं अशी माणसं फुटलेली बघितली, अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर केली.

धाराशिव शहरात गुरुवारी शिवसेना संघटन कार्यशाळा पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख शंकराव बोरकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, 5 हजार कोटी रुपये आणले म्हणून सत्कार जरूर करावा. आपल्या घरचे पैसे खर्च करावे आणि सत्कार करून घ्यावा. पाच हजार कोटी रुपयांसाठी आपली इस्टेट विकावी त्यातून काम करावे आणि त्या कामाचा सत्कार करून घ्यावा. 5 हजार कोटी रुपये हे जनतेच्या टॅक्समधून जमा झालेला पैसा आहे. तुमचे पैसे आणि पाठ थोपटून घ्यायची का? आता शोधावे लागेल 5 हजार कोटी रुपये कुठून कुठे गेले. अजून पण तुळजापूरच्या रस्त्याची अवस्था काय आहे ? ते सर्वांना माहित आहे. 5 हजार कोटी रुपयांची केलेली कामे दाखवा, असे आवाहन ही त्यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोक ओळखतात निवडणूक आली म्हणून कोण काम करते आणि पाच वर्ष अखंडपणे कोण काम केले. माणसाची मानसिकता त्याच्या त्याच्या आचरणावरून लक्षात येते हे आचरणाच पुरेसे आहे. पद म्हणजे ताम्रपट आहे का? की बाप जाद्याची जहागिरी आहे ? असे ही त्यांनी विचारले. ज्या दिवशी मी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली त्या दिवशीच मी निवडणुकीची तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. ओमराजे हा तुमच्या घरातील सदस्य आहे. उमेदवार नाही आणि हे नाते मी मागील पाच वर्षापासून जपले आहे.

'भाजपची मंडळी खासगीत सांगतात आम्ही तुमच्या सोबतच'

मोदी यांचा राजकारणात जन्म 2014 साली झाला. मोदी नसतानाही धाराशिवमध्ये शिवसेनेचा खासदार होता. हे भारतीय जनता पार्टी विसरली आहे. भाजपाचे काही लोक मला खासगीत सांगतात की आम्ही तुमच्या सोबतच आहोत, असा ही गौप्यस्फोट त्यांनी केला. राष्ट्रवादी आणि शिवसेना सोडल्यामुळे भाजप विषयीचे लोकांचे मत खराब झाल्याचे हे त्यांनी सांगितले.

Edited by: Sachin Waghmare

SCROLL FOR NEXT