Dharashiv News : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत त्यांचे सहा खासदार फोडले. यात धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा देखील समावेश असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर केवळ ठाकरेंच्याच शिवसेनेला धक्का बसला नाही तर जिल्ह्यातील शिवसेनेत देखील राजकीय भुकंपाचे धक्के बसले.
ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रवेशानंतर लगेच कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आणि जिल्ह्यातील शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, माजी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी उघडपणे आपली खंत व्यक्त करत थेट पक्षालाच 'मी, पक्षाकडून अंतिम निरोपाची वाट पाहतोय' अल्टिमेटम दिला आहे. सध्या या नाराजीसह दिलेल्या अल्टिमेटमची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवरील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. तर त्यांच्या प्रवेशानंतर अवघ्या काही तासांतच पक्षाकडून जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांची पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्याकडून हा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. यामुळे केवळ दोन-तीन महिन्यांपूर्वीच नियुक्ती झालेल्या जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी थेट पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हाप्रमुखपदावरून हटवल्यानंतर आता पिंगळे यांनी 'आमचं नेमकं काय चुकलं?' असा सवाल पक्षाला विचारला असून पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आपण काम केलं. पक्षाची धुरा सांभाळली. अवघे दोन महिने जिल्हाप्रमुखपदावर नियुक्ती मिळाली. या कालावधीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठं यश मिळवून दिलं. मात्र पक्षाने अवघ्या दोन महिन्यांतच माझे जिल्हाप्रमुख पद काढून घेतले. आता याचीच मनाला प्रचंड खंत वाटत असल्याचे पिंगळे म्हणाले.
याचवेळी पिंगळे यांनी खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याशी आपले कोणतेही वैयक्तिक वैर नसून त्यांच्या पक्षात येण्याचा आनंद झाला होता. आता त्यांच्यासोबत मिळून-मिसळून आणि ताकदीने काम करण्याची तयारी केली होती. पण स्थानिक जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पक्ष नेतृत्वाने थेट जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली. ज्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यातून शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचा दावा पिंगळे यांनी केला आहे.
सोबतच पिंगळे यांनी पक्ष नेतृत्वावर थेट निशाणा साधत आता आपल्याकडे पद नसून आपल्याला पक्ष बोलावतो आणि आपल्यावर झालेला अन्याय कधी दूर करतो याची वाट पाहत असून आपण पक्षाच्या अंतिम निरोपाची वाट पाहतोय, अशा शब्दांत पिंगळे यांनी पक्षाला अल्टिमेटम दिला आहे.
दरम्यान एकीकडे नाट्यमय घडामोडीनंतर खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्याचे बोलले जात होते. मात्र आता दुसरीकडे पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर या वादावर एकनाथ शिंदे कोणता तोडगा काढतात, हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.