मराठवाडा

Omraje Nimbalkar : शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर खासदार ओमराजे पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; धाराशिवच्या विकासकामांसाठी घातले साकडे!

Omraje Nimbalkar seeks approval for pending projects : शिंदेसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांची भेट घेत धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांसाठी निधी व मंजुरीची मागणी केली.

Rashmi Mane

Marathwada Politics : लाखोंच्या मताधिक्याने ज्या मतदारांनी लोकसभेला निवडून दिले, त्या लोकांची विकासकामे करता येत नाहीत, साधा एक ट्रान्सफार्मर बदलायचा तर त्याला महिनो लागतात, असा सूर लावत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचे ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून गेलेले खासदार सांगतात.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची साथ सोडलेलेले आणि मतदारसंघात टीकेचे धनी ठरलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पक्ष सोडल्यानंतर झालेल्या या पहिल्या भेटीतच ओमराजे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील रखडलेली विकासकामे, त्यासाठी निधीची तरतूद करण्याच्या मागण्यांचा भडीमार केला. विकासकामे व्हावीत म्हणून पक्ष सोडला आणि सत्ताधारी पक्षात गेलो, असे समर्थन करणाऱ्या ठाकरेंच्या सहा खासदारांवर आता मतदारसंघाचा कायापालट करण्याचे प्रचंड दडपण आहे.

मुख्यमंत्र्यांची भेटीत ओमराजे निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत होते. मुंबई येथे घेतलेल्या या सदिच्छा भेटीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न व जनहिताच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले. शेतकरी, पाणी, सिंचन, वीज व औद्योगिक विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी या मागणीचा समावेश आहे.

याशिवाय 7 टीएमसी पाण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करून प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावीत, पिकविम्यातून वगळलेले ट्रिगर पुन्हा लागू करून शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळण्यासाठी विमा कंपनीच्या निकषांमध्ये आवश्यक बदल करावेत, महावितरण कार्यालयाचे विभाजन करून वैराग येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय स्थापन करावे या मागण्या नमूद केल्या आहेत.

शेतजमीन खरवडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने त्यांना तात्काळ आर्थिक मदत वितरित करावी. मांजरा व तेरणा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करून जलसाठा वाढविण्याची योजना राबवावी. कौडगाव एमआयडीसीमध्ये लॉजिस्टिक पार्कची स्थापना करून परिसरातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी, याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी व मंदिर प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधून राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ, सुरळीत व जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, याबाबत सविस्तर चर्चा प्रत्यक्ष भेटीत करण्यात आली. मतदारसंघातील जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लागावेत, शेतकरी, विद्यार्थी, उद्योग व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती ओमराजे निंबाळकर यांनी फडणवीस यांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT