Parbhani-Hingoli Local Body Constituency : विधान परिषदेच्या सतरा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यात परभणी-हिंगोली, लातूर-बीड-धाराशिव, जालना-छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकाही होणार आहेत. गेल्या सहा वर्षात मराठवाड्यात, राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघामधील चित्र, राजकीय परिस्थिती, दावेदारी या सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत.
मराठवाड्यात विधानसभा, महापालिक, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने नंबर एकचा पक्ष होत मित्रपक्षांनाही मागे टाकले. आता या जोरावरच युतीमध्ये मित्रपक्ष शिवसेनेकडे असलेल्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर भाजपाने दावा सांगितला आहे.
एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील आमदार राजू नवघरे यांनी ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे, आमच्याकडे सर्वाधिक सदस्य असल्याचा दावा करत आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे म्हटले आहे. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी मात्र आपल्याकडे 151 मतदान असल्याचा दावा करत ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आपण मागणी करणार असल्याचे भुमरे यांनी म्हटले आहे. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडे 99, जनस्वराज्याचे 13 आमदार गुट्टे यांच्या यशवंत सेनेचे 39 असे एकूण 151 मतदान असल्याचा दावा केला आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 131 व शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 मतदान असल्याने ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे सुरेश भुमरे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेवर दबाव?
भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राहुल नवघरे यांनी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दावेदारी केल्याने शिंदेंच्या शिवसेनेवर दबाव वाढला आहे. विप्लव बजोरिया यांच्या रुपाने 2018 मध्ये ही जागा शिवसेनेने जिंकली होती. कागदावर स्पष्ट बहुमत असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा त्यावेळी पराभव झाला होता.
महायुतीने गेल्यावेळी विप्लव गोपीकिसन बाजोरिया यांना उमेदवारी दिली होती. जिल्ह्याबाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली. पण बजोरिया यांनी ही जागा जिंकत शिवसेनेचा भगवा फडकवला होता. निवडणूक जाहीर झाली तेव्हा परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 497 मतदार होते.
काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे अधिकृतपणे 240 पेक्षा जास्त स्वतःचे सदस्य होते. तर शिवसेना भाजप युतीकडे केवळ 130 मते होती. तर एमआयएम व काही अपक्षांची मते निर्णायक ठरली होती. आघाडीकडे 100 पेक्षा जास्त मते होती, त्यामुळे सुरेश देशमुख यांचा विजय सोपा वाटत होता. मतदारांची पळवापळवी रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या मतदारांना गोवा आणि इतर पर्यटन स्थळांवर सहलीसाठी पाठवले होते.
दुसरीकडे, निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर 'आर्थिक रसद' आणि महागड्या वस्तू वाटल्या गेल्याच्या आरोप त्यावेळी झाला होता. काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांना त्यांच्याच आघाडीतील मित्रपक्ष 'राष्ट्रवादी काँग्रेस'मधील एका मोठ्या गटाने अंतर्गत विरोध केला. परभणी आणि हिंगोलीतील स्थानिक राजकीय हेवेदाव्यांमुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पडद्यामागून शिवसेनेच्या बाजोरिया यांना मदत केल्याचे बोलले जाते.
जेव्हा 24 मे 2018 रोजी मतमोजणी झाली, तेव्हा निकाल पाहून सगळ्यानाच धक्का बसला होता. शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांना 256 तर काँग्रेस आघाडीच्या सुरेश देशमुख यांना 215 मते मिळाली होती. 41 मतांच्या आघाडीने बजोरिया विजयी झाले होते. सध्या परभणी जिल्ह्यात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पद, जिल्हा परिषदेची सत्ता याच पक्षाकडे आहे. या जोरावरच भाजपाने परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरूवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.