Marathwada Politics News : देशातील नव्हे तर जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले आहे. विशेषतः मराठवाड्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सगळ्या पक्षातून बडे नेते भाजपवासी झाले आहेत. या प्रत्येकाला पक्ष प्रवेशावेळी कुठला ना कुठला शब्द दिला गेला आहे. आता तो शब्द खरा करून दाखवण्याची घटिका समीप आली आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजप सहा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. या सहा जागांसाठी राज्यभरातून किमान डझनभर नावे समोर आली आहेत. यात मराठवाड्यातील संजय केनेकर, सुरेश बनकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, प्रज्ञा सातव, कैलास गोरंट्याल या प्रमुख नावांचा समावेश आहे.
संजय केनेकर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 13 रोजी संपत आहे. त्यांना फक्त अकरा महिने काम करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या केनेकर यांना आणखी एक संधी मिळावी, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. भाजपच्या संभाव्य यादीत त्याचे नाव असल्याची माहिती आहे.
काँग्रेसच्या (Congress) आमदारकीचा राजीनामा देत सहा महिन्यापूर्वीच प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांना पुनर्वसनाचा शब्द पक्षप्रवेशावेळी देण्यात आला होता. त्यामुळे सातव यांच्या जागेसाठी विधानपरिषदेची पॊटनिवडणूक होत आहे. त्यामुळे सातव यांची त्या जागेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा बाकी आहे.
जालन्याचे माजी आमदार व महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले कैलास गोरंट्याल यांचीही दावेदारी मजबूत मानली जात आहे. जालना महापालिकेतील भाजपच्या (BJP) शतप्रतिशत सत्ता आणण्यात कैलास गोरंट्याल यांचा मोठा वाटा होता. शिवाय शिवसेनेचे उपनेते तथा विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे. शिंदेच्या शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपकडून कैलास गोरंट्याल यांना संधी दिली जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्याचा फायदा त्यांना विधान परिषदेत जाण्यासाठी होऊ शकतो.
बीडच्या क्षीरसागरांकडूनही चाचपणी..
बीड जिल्ह्यातील बडे नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सध्या मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे. बीड नगरपालिका निवडणुकीत क्षीरसागर यांनी भाजपचा उघडपणे प्रचार केला होता. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जातोय, परंतु त्यात मंत्री पंकजा मुंडे यांचा अडसर असल्याची चर्चा आहे. भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेत त्यांना मंत्री केले. त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्यानंतर बीडमधील आणखी एका नेत्याला मागच्या दाराने आमदार करत क्षीरसागर यांचे पुनर्वसन केले जाते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सत्तारांना घाम फोडणाऱ्या बनकरांना संधी?
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात शिवसेना-महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांनी महायुतीच्या अब्दुल सत्तार यांना चांगलाच घाम फोडला होता. अवघ्या 2 हजार 420 मतांनी बनकर आमदार होता होता राहिले. पराभवानंतर ते पुन्हा स्वगृही परतले. नुक्त्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवत अब्दुल सत्तार यांच्या वर्चस्वाला दुसरा धक्का दिला होता. या पार्श्वभूमीवर सुरेश बनकर यांना विधान परिषदेवर घेत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.