Marathwada ZP News : महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर लढतींचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. यंदाच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 54 जागांच्या जिल्हा परिषदेत एकही पक्ष सर्व जागांवर निवडणूक लढवत नाहीये. पक्षांतर्गत संघर्ष, अपूर्ण युती आणि मोठ्या प्रमाणावरील पक्ष बदल यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार आहे.
उमेदवारांच्या संख्येत भाजप आघाडीवर असून त्यांनी 49 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे 42 उमेदवार मैदानात आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या या दोन पक्षांनी जिल्हा परिषदेत वर्चस्व मिळवण्यासाठी स्वतंत्र ताकद आजमावली असली, तरी परस्परांतील अहंकारामुळे युतीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. मागील दहा वर्षांपासून परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असून शिवसेना ही त्यांची प्रमुख प्रतिस्पर्धी राहिली आहे.
काँग्रेसने अधूनमधून आव्हान निर्माण केले, मात्र भाजप आजवर जिल्हा परिषदेत बॅकफूटवरच राहिला. मागील निवडणुकीत राज्यात सत्ता असूनही भाजप-शिवसेनेला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करता आली नव्हती. यंदाही राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची सत्ता असतानाही स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव ठळकपणे समोर आला आहे. राष्ट्रवादीने मोठा भाऊ असल्याचा दावा करत तडजोडीस स्पष्ट नकार दिला, तर राज्यातील सत्तास्थानाच्या जोरावर भाजपने जिल्हा परिषदेतही वर्चस्वाची अपेक्षा ठेवली होती.
मात्र, दोन्ही बाजूंच्या कुरबुरींमुळे युती शक्य झाली नाही. भाजपला जिंतूर विधानसभा वगळता इतर भागांत उमेदवार शोधताना मोठी कसरत करावी लागली. गंगाखेडची जबाबदारी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे सोपवण्यात आली. दरम्यान, माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांना समर्थकांसाठी तिकिटे मिळवण्याची संधी देण्यात आली. पाथरीत शिवसेनेशी समन्वय न झाल्याने भाजपाला माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यावर जबाबदारी टाकावी लागली.
भाजपने शेवटच्या टप्प्यात शिवसेनेला 25 जागा दिल्या. मात्र, त्यातील अनेक उमेदवार ऐनवेळी इतर पक्षांतून घेतलेले असल्याने निष्ठावंतांना कितपत संधी मिळाली, याबाबत संभ्रम कायम आहे. परभणी तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याने अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने भाजपाची अंतर्गत कोंडीही उघड झाली आहे. उमेदवारांच्या संख्येत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस व उद्धव ठाकरे गटालाही मागे टाकले आहे.
वंचितचे 24, उद्धवसेनेचे 23 तर काँग्रेसचे केवळ 21 उमेदवार आहेत. थोडी तडजोड झाली असती, तर काँग्रेस - उद्धवसेना - वंचित या तीन पक्षांना मिळून सर्व जागांवर निवडणूक लढवता आली असती. मात्र, काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करत काँग्रेसने वंचित व रासपला सोबत घेतल्याचे बोलले जात आहे. एकूणच, पक्षांतील अंतर्गत राजकारण, अपूर्ण आघाड्या, पक्षबदल आणि नेतृत्वातील संघर्ष यामुळे परभणी जिल्हा परिषद निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.