Dharashiv News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून विविध जिल्ह्यांना याचा तडाखा बसला आहे. यात अतिवृष्टीचा सर्वात जास्त तडाखा राज्यातील शेतकर्यांना बसला आहे. त्यामुळे आधीच विविध संकटांनी खचलेल्या बळीराजाला अडचणीत आला असून आत्महत्येच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे सरकारकडून नुकसानभरपाईची मागणी जोर धरू लागली असतानाच केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी धाराशिव दौऱ्यावर आले असताना शनिवारी (ता.23) वादग्रस्त विधान केल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पटेल म्हणाले,आता अनेक प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. आता ज्या पध्दतीनं पावसात नुकसान झालं आहे. ही नुकसानभरपाई कुणी करु शकेल का हो..., तर नाही. शेतकऱ्याचं जेवढं नुकसान झालं आहे, ते भरून काढण्याची क्षमता कुणाचीच असू शकत नाही, असंही पटेल यांनी म्हटलं.
तसेच सध्या सरकारच्या वतीनं आपण नुकसानभरपाई नाही,तर मदत करू शकतो.आपण फक्त मदत करू शकतो. जे नुकसान झालंय, ते भरून काढणं शक्यच नाही. आता तुमचं जे नुकसान दिसू लागलं आहे ना, त्याची आता आपल्याला सवय करुन घ्यावी लागणार आहे असंही पाशा पटेल यांनी यावेळी सांगितलं.
आता कधी पाऊस जास्त पडून, तर कधी पाऊस कमी पडून हे असं वारंवार घडणार आहे. कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्यामुळे कधी गारपीट झाल्यामुळे, कधी थंडी वाढल्यामुळे 365 दिवसांपैकी 322 दिवस शेतकर्यावर संकटं हे येणार आहेत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा खळबळजनक दावाही पटेल यांनी केला आहे.
आपण निसर्गाचा जो प्रचंड नाश केला आहे.त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहे.365 दिवसांपैकी 322 दिवस शेतकऱ्यांना (Farmers) संकटाला तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला आहे.
ते एवढ्यावर थांबले नाहीत तर अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीबाबत झटकले.धाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केले आहे.
सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे.
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल धाराशिव येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादग्रस्त वक्तव्य केले, शेतकऱ्यांनी निसर्गाचा ऱ्हास केला ही कर्माचे फळ त्यांना भोगावे लागते. त्यावर आता शेतकरी चळवळीतील नेते विजय घाडगे यांनी संताप व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांच्या जीवावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेता झालेल्या पाशा पटेल यांनी शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे.सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर पाय दिंडी करणाऱ्या पाशा पटेल यांनी,स्वतः आत्मपरीक्षण करावं,अशी संतप्त प्रतिक्रिया घाडगे यांनी दिली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील बोगस मतदार प्रकरणावरुन गंभीर आरोप केले होते.त्यावर बोलताना भाजप नेते पाशा पटेल यांनी जोरदार पलटवार केला आहे. पडल्यानंतर कितने खट्टे हे अंगूर म्हणण्याची सवयच असल्याचे पटेल म्हणाले.
तसेच बोगस मतदान झाल असते, तर कोणालाच निवडून येऊ दिले नसते असं मतही पाशा पटेल यांनी व्यक्त केले. बाकीचेही काही खासदार निवडून आले आहेतच की असे पाशा पटेल म्हणाले. आमच्या हातात जर शक्ती असती, तर आम्ही धाराशिवचा खासदार निवडून येऊ दिला नसता, असा दावाही पाशा पटेल यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.