Prithviraj Chavan Sarkarnama
मराठवाडा

Prithviraj Chavan News : भाजपला बहुमत मिळणे अशक्यच; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली 'ही' कारणं...

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : भाजपला 2019 मध्ये 37 टक्के मते मिळाली होती, म्हणजेच 63 टक्के लोक मोदींच्या विरोधात आहेत. त्याचा विचार करून यावेळी इंडिया आघाडीची स्थापना करून बहुतांश ठिकाणी एकास एक उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टळले असून, पहिल्या तीन टप्प्याचे विश्‍लेषण पाहता देशात भाजपला बहुमत मिळणार नाही. कोणत्याच राज्यात भाजपच्या जागा वाढताना दिसत नाहीत, असा दावा माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांच्या प्रचारासाठी चव्हाण शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना सद्यस्थितीवर भाष्य केले. 2010 ला भाजपला केवळ 20 टक्के मते मिळाली होती. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आश्वासने दिल्यामुळे त्यात वाढ होऊन ती 31 टक्के झाली. 2019 च्या निवडणुकीत त्यात 6 टक्क्यांची वाढ झाली, पण उर्वरित मतदार मोदींच्या विरोधात आहेत.

मतांचे विभाजन टाळण्यासाठी यावेळी इंडिया आघाडीची India Alliance स्थापना करण्यात आली. देशभरातील वातावरण इंडीया आघाडीसाठी सकारात्मक आहे. काही ठिकाणी आम्हाला एकास एक उमेदवार देता आले नाहीत. वंचित बहुजन आघाडीने देखील काही ठिकाणी उमेदवार उभे करून मतविभाजनाद्वारे भाजपला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. देशभरात भाजपच्या विरोधात सुप्त लाट निर्माण झाली आहे.

गेल्या दहा वर्षाच्या काळात नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी केवळ आश्वासने दिली, पण त्यावर ते बोलायला तयार नाहीत. उलट धार्मिक तेढ निर्माण करण्यावर त्यांच्या भाषणाचा कल आहे, पण निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करत नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मादी त्यांच्या दहा वर्षात झालेल्या कामावर, भाजपच्या जाहीरनाम्यावर, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर बोलत नाहीत.

कापसाला, सोयाबीनला भाव नाही. आता कांद्यावरील निर्यात बंदी उठविली पण त्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्यात आले आहे. हे निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी शेतकरी पुत्र म्हणविणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी चव्हाण Prithviraj Chavan यांनी केली. निवडणूक रोखे काढून मोदी सरकारने मोठा घोटाळा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरविले आहेत. देशात इंडिया आघाडीचे सरकार येताच या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT