Ranajagjitsinha Patil, Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Ranajagjitsinha Patil : राणाजगजितसिंह पाटलांचा तेलंगणातून उद्धव ठाकरेंवर निशाणा; काय आहे कारण ?

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv News : तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रामगुंडम येथून थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरेंमुळे धाराशिव जिल्ह्याचा विकासाला खीळ बसल्याची टीका पाटलांनी केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये रणकंदन होणार आहे. पाटलांना ठाकरे गटाकडून कसे प्रत्युत्तर मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. (Latest Political News)

भाजपच्या वतीने पाटील तेलंगणातील रामगुंडम मतदारसंघात आढावा घेत आहेत. त्यावेळी त्यांनी धाराशिवच्या विकासाला ठाकरे सरकारने कसा `ब्रेक` दिला याबाबत माहिती दिली. रामगुंडममधील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा हेवा राणाजगजितसिंह पाटील यांना वाटला. तेथील पाण्याचे नियोजन पाहून धाराशिव जिल्ह्यातही मुबलक पाणी असते, मात्र माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी प्रकल्पाला `ब्रेक` लावल्याचा आरोप पाटलांनी यावेळी केला. यामुळे धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी शाब्दिक चकमक होण्याची शक्यता आहे.

पाटील म्हणाले, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी 'वॉटर ग्रीड' ही संकल्पना मांडली होती. ते मुख्यमंत्री असताना धाराशिव जिल्ह्यामध्ये उजना, शीना कोळेगाव आणि निम्न तेरणा धरणे एकमेकांशी जोडण्याचे नियोजन झाले होते. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही सुरु केली होती. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारने याला 'ब्रेक' दिला. परिणामी जिल्ह्याचा विकास खुटंला आहे."

तेलंगणामध्ये गोदावरीचे खूप पाणी उपलब्ध आहे. अडीचशे किलोमीटर अंतर असतानाही हे पाणी हैदराबादसाठी नेले जाते. यावर पाटील म्हणाले, "आपल्याकडेही कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्यासाठी उपलब्ध असलेले सुमारे २३ टीएमसी पाण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सात टीएमसीचे नियोजन असून त्यासाठी ११ हजार कोटी रुपयांचे नियोजन सरकारने केले आहे. सध्या हे काम सुरू असून एप्रिल २०२४ पर्यंत कृष्णा खोऱ्यातील पाणी तुळजापूर येथे येईल. टप्याटप्याने हे पाणी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात पोचेल", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

"पाणी मिळाल्यानंतर सतत दुष्काळी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेती आणि उद्योगधंद्याना लाभ होईल. एका वर्षात एक हजार तरुणांना विविध योजनांच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभे केले आहे. या माध्यमातून केंद्र सरकारची आठ कोटी रुपयांचे आनुदानही यांना मिळाले आहे. रोजगार निर्मितीसाठी तामलवाडी, नळदुर्ग आणि कळंब येथे नवीन एमआयडीसी विकसित करण्याचा प्रयत्न आहे", असेही, राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

तुळजापूर मतदारसंघाच्या विकासाबरोबरच संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातवर आपले वर्चस्व कसे राहील, यासाठी भाजपचे आमदार पाटील सतत प्रयत्नशील असतात. तर दुसरीकडे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) पालकमंत्री डॉ. तानाजी सावंतही तसा प्रयत्न करताना दिसतात. एवढेच नाही, तर सध्या शिवसेने (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकरही जिल्हावर वर्चस्व ठेवण्यासाठी धडपडत असतात. या वर्चस्वाच्या लढाईत कोण कसे आपले मोहरे हलवतो, आणि कोण कोणाला धोबीपछाड देतो, हे येणारी विधानसभा निवडणूक ठरवेल.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT