Sharad Pawar-Sandeep Kshirsagar
Sharad Pawar-Sandeep Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : शरद पवारांवरील निष्ठेपायी संदीप क्षीरसागरांनी तिसऱ्यांदा सोडली सत्तेची संधी....

Dattatrya Deshmukh

Beed News : अगोदर पद आणि मग सत्तेचा प्रवाह कोणालाच नको नसतो. परंतु, संदीप क्षीरसागर यांनी कायम शरद पवार निष्ठा हे सूत्र ठेवले. त्यासाठी त्यांनी तिसऱ्यांदा सत्तेचा प्रवाह सोडण्याचे धाडस केले. त्यांच्या या निष्ठेचे फळ त्यांना मिळाले असून त्यांच्या जिल्हा नेतृत्वावर गुरुवारच्या स्वाभीमान सभेच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. (Sandeep Kshirsagar, loyal to Sharad Pawar, gave up chance of power for third time....)

सभा यशस्वी करून दाखविणाऱ्या संदीप क्षीरसागर यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर नेत्यांसह काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील यांनीही कौतुक केले.

काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या संदीप क्षीरसागर यांनी सभापती आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचे सभापती म्हणूनही काम केले. त्यांनी २०१६ मध्ये आपल्या दोन्ही काकांना आव्हान देत काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून अगोदर नगरपालिका, नंतर याच आघाडीच्या माध्यमातून पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. त्यावेळी भाजपने सोबत येण्याची दिलेली ऑफर त्यांनी धुडकावत आपण ‘शरद पवारांसोबतच’ असे जाहीर केले. यामुळे त्यांची बीड पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागाची संधी गेली.

दरम्यान, २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर आपण ‘पवारांसोबतच’ म्हणणारे संदीप क्षीरसागर हे पहिले आमदार होते. आता परवाच्या नव्या समीकरणानंतरही ‘आपली निष्ठा पवारांसोबतच’ असे जाहीर करणारेही क्षीरसागर हे पहिले आमदार ठरले. समोर सत्ता आणि सर्वच सत्ता प्रवाहात असताना असे राजकीय धाडस दाखविण्याची हिंमत दाखविणाऱ्या संदीप क्षीरसागर यांच्यावर शरद पवारांनीही सुरुवातीपासून तेवढाच विश्वास ठेवला. अगोदर विधानसभेची उमेदवारी आणि आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद दिले. यानंतर विसावलेला पवारांचा दौरा बीडच्या सभेपासून सुरु झाला. याची जबाबादारीही क्षीरसागरांवर दिली. आमदार क्षीरसागरांनीही ही जबाबदारी एकहाती पेलत सभा यशस्वी करून दाखविली.

जिल्हाध्यक्षपद व सभेच्या जबाबदारीच्या निमित्ताने त्यांना जिल्ह्याच्या नेतृत्वाची संधीही मिळाली. मग, सभेत पवारांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही क्षीरसागर यांनी एकहाती धनुष्य पेलल्याचे सांगून त्यांनी एकदाही प्रदेश कार्यालयात कुठल्या मागणीचा फोन केला नाही, असे निक्षूण सांगितल्याने भल्या मोठ्या सभेसाठी लागणारा ‘खर्च करण्याची दानत’ देखील त्यांच्यात असल्याचे सिद्ध झाले.

जितेंद्र आव्हाडांनीही ‘कभी कभी सैलाब आता है, और’ असे म्हणत हे घडले नसते तर संदीप क्षीरसागर यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली नसती, असे सांगितले. माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील यांनीही संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर मोहर उमटविली.

केशरकाकू ते संदीप क्षीरसागर

संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर शिक्का मारताना शरद पवार यांनी दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण सांगितली. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करत असताना त्यावेळी खऱ्या नेतृत्वापेक्षा काही लोकांनी वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. त्यावेळी बीडचे नेतृत्व दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं. आता हेच काम संदीप क्षीरसागर करत आहेत, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT