Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा जोरदार युक्तिवाद सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केला. तर या हत्याकांडात विनाकारण गोवल्याचा दावा करत कराडच्यावतीने खंडपीठात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. न्या. एस. एम. घोडेस्वार यांच्यासमोर हा युक्तिवाद झाला. या प्रकरणाची उर्वरीत सुनावणी मंगळवारी (ता.16) होणार आहे.
मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड हा गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेत आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ अंतर्गत अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे कलम लागू असताना आरोपीला सहजासहजी जामीन मिळत नाही. पण तरीही वाल्मिकच्या जामिनासाठी त्यानं खंडपीठात धाव घेतली आहे. वाल्मिकच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, वाल्मिक कराडल अटक करताना लेखी माहिती किंवा नोटीस दिली नाही. याचा संदर्भ देताना सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा विरुद्ध राज्य सरकार यांसह विविध निवड्यांचा यावेळी हवाला देण्यात आला.
वाल्मिक कराडला लावलेला मकोका चुकीच्या पद्धतीने लावला. वाल्मिक कराड याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेंव्हा कराड शेकडो किलोमीटर दूर होता. या प्रकरणात कराडला खोट्या पद्धतीने गोवण्यात आल्याच्या मुद्याही यावेळी त्याच्या वकिलांनी मांडला. या जामीन अर्जावर शुक्रवार (ता. 12) सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी सुरु झाली. यावेळी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी सायंकाळपर्यंत सलग सहा ते सात तास युक्तीवाद केला. गिरासे यांनी वाल्मिक कराडचे खून प्रकरणाशी थेट कसा संबध आहे? याचे अनेक पुरावे आणि प्रत्येक तारखेनुसार घटनाक्रम तपशीलवार उलगडून दाखवला. या घटनेतील साक्षीदार, सीडीआर अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकॉर्डींग, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात दाखविण्यात आला.
या सगळ्या पुराव्यांवरुन वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद गिरासे यांनी केला. कराडने अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे कराडने सुदर्शन घुले याला कंपनीला बंद करण्यासाठी पाठवले होते. घुलेने कंपनीच्या पहारेकऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. अधिकाऱ्यांना खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमक्या देत कंपनी बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीड जिल्ह्यातील अतिशय मागास भागातील कंपनी बंद होऊ नये आणि येथील तरुणांचा रोजगार जाऊ नये, अशी विनंती सरपंच संतोष देशमुख यांनी केली होती. तसेच पोलिसात तक्रार दिली होती. त्यावर सुदर्शन घुलेने देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणानंतर कराड याने आपल्या मागणीच्या आड येणाऱ्या देशमुखला आडवा करा, असा आदेश दिला. त्यानुसार सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उमरी टोलनाक्यावरुन संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यांना निर्जन जागी नेऊन मानवतेला काळीमा फासणारे कृत करत मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर बोलणे सुरू होते. कराड हाच मारेकऱ्यांना निर्देश देत होता, अशी बाजू गिरासे यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.