Pritam Munde News, Beed sarkarnama
मराठवाडा

Beed Loksabha News : मागच्या लोकसभेला सात आमदार, आता तिघेच ; डाॅ. मुंडेंना ताकद लावावी लागणार..

Datta Deshmukh

Marathwada : २०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती, देशात मोदी लाट विरोधात प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता. परिणामी डॉ. मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाल्या. (Beed Loksabha News) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाट, राज्यात भाजपची सत्ता आणि घरातच मोठ्या बहिण पंकजा मुंडेंकडे पालकमंत्रीपद असलेल्या डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठी भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादीच्या एक अशा सात आमदारांनी ताकद लावली होती.

विशेष म्हणजे जिल्हा परिषदेची सत्ताही त्यावेळी भाजपच्या ताब्यात होती. आता जिल्ह्यात (Bjp) भाजपचे तीनच आमदार असून घरात वा जिल्ह्यात देखील पालकमंत्रीपद नाही. जिल्हा परिषदेवरही भाजपची सत्ता नाही. त्यामुळे डॉ. मुंडे (Pritam Munde) यांना आगामी काळात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. भलेही लोकसभा निवडणुक आणखी वर्षभरावर असली तरी निवडणुकीची पायारभणी आतापासूनच सुरु झाली आहे. विशेषत: भाजपने मोदी @9 मोहिमेच्या माध्यमातून २०२४ च्या लोकसभेची तयारी सुरु केली आहे.

या अभियानात डॉ. मुंडे यांनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एंट्री घेत मागील नऊ वर्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांचा उहापोह नुकताच केला. याच काळात त्यांनी दिव्यांसाठीचे जिल्हाभरात तालुकानिहाय शिबीरेही घेतले आहेत. (Beed News) पंरतु, जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा आणि निवडणुकीत कळीचा मुद्दा असलेल्या नगर-बीड-परळी लोहमार्गाचे काम २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे आपण म्हणालोच नव्हतो, असा दावाही त्यांनी यावेळी केला. (Marathwada) त्यामुळे या कामाला झालेली दिरंगाई देखील आगामी निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे.

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची धुळपेरणी आणि पायाभरणी आतापासूनच सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर मागील दोन निवडणुकांचा प्रचार आणि निकालावर नजर टाकली असता मागच्या दोन्ही निवडणुकांत भाजपला पुरक वातावरण होते हे स्पष्ट आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या घरात त्यांच्यानंतर सामाजिक, जलसंधारण कामांच्या निमित्ताने त्यांच्या मोठ्या कन्या पंकजा मुंडे राजकारणाशी जोडल्या गेल्या. २००९ साली प्रथम दिवंगत मुंडेंनी लोकसभेच्या आखाड्यात प्रवेश केल्यानंतर पंकजा मुंडे परळी विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आणि विजयी देखील झाल्या.

मात्र, डॉ. प्रितम मुंडे राजकीय परिघापासून दुरच होत्या. दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत विजयानंतर केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिवंगत मुंडे यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळीच लोकसभेचीही पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत भाजपने डॉ. प्रितम मुंडे यांना उमेदवारी दिली. तत्पुर्वी पंकजा मुंडे यांनी राज्यभरात संघर्ष यात्रा काढलेली होती. देशात मोदी लाट कायमच होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकारही होते. दिवंगत मुंडेंच्या निधनाची सहानुभूती आणि विरोधात राष्ट्रवादीकडून उमेदवार नव्हता. परिणामी डॉ. मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाल्या.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत देखील जिल्ह्यात भाजपसाठी पोषक वातावरण होते. राज्यात भाजपच्या सत्तेत पंकजा मुंडे प्रमुख मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्ह्यात दिलेला होता. परळीत खुद्द मुंडे तसेच गेवराईत लक्ष्मण पवार, केजमध्ये प्रा. संगीता ठोंबरे, माजलगावमध्ये आर. टी. देशमुख आणि आष्टी - पाटोदा - शिरुरमध्ये भिमराव धोंडे भाजपचे आमदार होते. तसेच, लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस देखील भाजपचे आमदार होते. अशा सहा आमदारांनी भाजपसाठी ताकद लावली होती.

सहा आमदारांच्या जोडीला त्यावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्यात एकमेव असलेले तत्कालिन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी देखील भाजपचाच प्रचार केला होता. तत्कालिन परिस्थितीत केज व माजलगाव मतदार संघात स्थानिक आमदारांबद्दल नाराजी असली तरी रमेशराव आडसकर यांच्यासह इतर भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी प्रितम मुंडे यांच्यासाठी कंबर कसत आपापल्या भागांत खिंड लढविली होती. एकूणच सात आमदारांसह सत्तेचा लाभ भेटलेली दुसरी फळी ताकदीने लोकसभेच्या मैदानात होती. आता परिस्थिती बदलेली आहे.

लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीतच पंकजा मुंडे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झालेला आहे. जिल्ह्यात आता विधानसभेत केजमध्ये नमिता मुंदडा आणि गेवराईत लक्ष्मण पवार हे दोनच आमदार आहेत. तिसरे आमदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे सुरेश धस आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेची सत्ता देखील नाही. राज्यात सत्तांतर झाले असले तरी बाहेरचा पालकंत्री असल्याने सत्तेची फळे आमदारांनाही काहीशी अंबट आहेत. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेते तर लाभापासून कोसो दुरच आहेत.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा जिल्ह्याशी संपर्कही काहीसा कमी आहे. राज्यात सत्ता असली तरी सत्तेचे ग्लॅमर फारसे नाही. एकूणच जय किंवा पराजय कोणाचा होईल हे आज सांगता येत नसले तरी भाजपला पुर्वीसारख्या जमेच्या बाजू नाहीत हेही वास्तव आहे. त्यामुळे जनसंपर्कात वाढ, पक्षातील नेत्यांचे एकत्रीकरण आवश्यक आहे.

शिवसेनेचे दोन भाग; मित्रपक्षही दुर

भाजपचा प्रमुख मित्रपक्ष शिवसेनेचेही दोन भाग झाले आहेत. जिल्ह्यात दोन्ही शिवसेनेपैकी ताकदवान कोणती यापेक्षा दोन गटांमुळे आहे ती ताकद तरी विभागली आहेच. महायुतीतील शिवसंग्राम, रिपाइं भाजपपासून आजघडीला तरी फटकूनच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT