Ajit Pawar, Dhananjay Munde, Sharad Pawar, Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar On Munde : शरद पवार गटाकडून टीकेचे बाण तर अजितदादांकडून मुंडेंवर कौतुकाचा वर्षाव ; म्हणाले,'' एक आदर्श...''

सरकारनामा ब्यूरो

Beed : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बीडमधील 'स्वाभिमान' सभेत कृषिमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवली होती. या सभेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीडमधील सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. अजित पवार बीडच्या सभेत पवार गटाच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, या सभेत अजित पवारांनी धनंजय मुंडेंवर कौतुकाचा वर्षाव केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी बीडमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीतील सामील होण्याच्या कारणासह अनेक मुद्द्यांवरची आपली भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे पोटतिडकीने बोलतात. पण काही लोकांनी त्यावर टीका केली. मुंडे यांच्याबाबत कोणी काय बोलून गेले पण आम्हांला त्यात पडायचं नाही. ते संकटाला कधी घाबरले नाहीत. एक आदर्श विधानपरिषदेचा नेता म्हणून त्यांची इतिहासात ओळख आहे. ३२ हजार फरकाने ते २०१९ ला निवडून आले. धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास हा संघर्षमय आहे. पण त्यांना बीड जिल्ह्यातील जनतेने कायमच प्रेम दिले असे कौतुकोद्गार अजित पवार यांनी काढले.

'' राजकारणात कोणी कायमचा दुश्मन आणि...''

अजित पवार( Ajit Pawar) म्हणाले, आम्ही राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतला. राजकारणात कोणी कायमचा दुश्मन आणि कायमचा मित्र नसतो. हे राजकारण आहे. राजकारणात प्रत्येकाचा काळ असतो. नवीन फळी तयार करायचे असते. मी निवडणुकीपुर्ती अश्वासने देणार नाही. आम्हाला राजकारणात ३०-३५ वर्षे झाली. शेतकरी हीच माझी जात आहे. बीड जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सगळ्या जिल्ह्यांना मी न्याय देणार आहे. विकासासाठी आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आलो असल्याचे पवार म्हणाले.

तुमचे सगळे प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले. सकारात्मक राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे अशी भुमिका स्पष्ट करतानाच त्यांनी देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा असल्याचा पुनरुच्चारही केला.

'' बीड जिल्हा हा राजकीय मैत्री जपणारा..''

बीड जिल्हा हा राजकीय मैत्री जपणारा आहे. तसेच बीडमध्ये राजकीय शत्रुत्व झालं नाही. गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde) आणि विलासराव देशमुख हे वेगवेगळ्या पक्षात होते. दोघे भाजप आणि काँग्रेसमध्ये होते. त्यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यांनी शेवटपर्यंत निभावली. बीडकरांनी ठरवलं तर ते काय करु शकतात हे आज सिद्ध झालं. समाजकारण आणि राजकारणाची सांगड कशी घालायची हे बीडकरांना चांगल माहित आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, आम्ही पदे ही मिरवण्यासाठी घेतलेली नाहीत. तर जनतेची प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विकासकामांसाठी आम्ही पदाचा वापर करत आहोत. विकासकामांसाठीआम्हांला कामं करायची आहे म्हणून आम्ही महायुतीसोबत गेलो असेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

आज मोदींचा देशामध्ये करिष्मा आहे. त्यांच्या करिष्म्याचा उपयोग या पुरोगामी महाराष्ट्राला झाला पाहिजे. आज अमेरिका, रशिया, चीननंतर जगामध्ये भारताचा नंबर लागतो, असेही अजित पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT