Ambadas Danve Rally For Water Issue News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : 'लबाडांनो पाणी द्या' सात लाख नागरिकांचा सहभाग, 45 किलोमीटरची पदयात्रा! उद्धवसेना 'हल्लाबोल'साठी सज्ज

Shiv Sena's Jan Andolan creates momentum in Sambhajinagar, concluding with a strong march led by Aditya Thackeray. : अंबादास दानवे यांनी 45 किलोमीटरची पदयात्रा काढून शहर ढवळून काढले. संभाजीनगरातील 90 वॉर्डामधील 7 लाख नागरिकांपर्यंत पोहोचून पाण्याच्या हक्कासाठी जनजागृती केली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी 13 एप्रिलपासून शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 'लबाडांनो पाणी द्या' म्हणत जनआंदोलन सुरू केले. येत्या 16 मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत 'हल्लाबोल मोर्चा'ने समारोप होणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी पक्षाचे वतीने सुरू आहे. हल्लाबोल यात्रेसाठी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शहरात 45 किलोमीटरची पदयात्रा काढून यात सात लाख नागरिकांनी सहभाग नोंदवल्याचा दावा केला जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नाला हात घातला. शिवसेना नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 45 किलोमीटरची पदयात्रा काढून शहर ढवळून काढले. संभाजीनगरातील 90 वॉर्डामधील 7 लाख नागरिकांपर्यंत पोहोचून पाण्याच्या हक्कासाठी जनजागृती केली. 13 एप्रिल 2025 पासून सुरू झालेले हे आंदोलन 16 मे रोजीच्या हल्लाबोल महामोर्चाने कळस गाठणार आहे.

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली 9 ते 12 मे या चार दिवसांत 'हल्लाबोल पदयात्रा' शहरातील विविध भागातून काढण्यात आली. ही पदयात्रा संभाजीनगरातील पाणीटंचाईविरोधातील सर्वात मोठी जनजागृती ठरली. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत नियोजित या पदयात्रेत 45 किलोमीटर चालत 90 वॉर्डांमधील प्रत्येक गल्ली-नाक्यावर पोहोचून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या तांत्रिक अडचणी, सरकारी नाकर्तेपणा आणि स्थानिक समस्यांवर सविस्तर माहिती देत जनतेला एकत्र आणण्याचे काम यातून करण्यात आले.

शिवसैनिकांनी 7 लाख नागरिकांपर्यंत आंदोलनाचा संदेश पोहोचवत संभाजीनगरात अभूतपूर्व जनजागृती केली. पाण्याच्या प्रश्नाचा दररोज सामना कराव्या लागणाऱ्या महिलांचा यात मोठा सहभाग होता. सातारा, चिकलठाण, हर्सूलसारख्या पाणीटंचाईने होरपळलेल्या भागांमध्ये महिलांनी रिकामे हंडे हातात घेऊन रस्त्यावर उतरत आपला संताप व्यक्त केला. 'लबाडांनो पाणी द्या' या आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा असल्याचेही दाखवून दिले.

अनेक ठिकाणी महिलांनी आपल्या दैनंदिन संघर्षाच्या कहाण्या सांगितल्या आणि पाण्यासाठीच्या लढ्याला बळ दिले. पदयात्रे दरम्यान, शेकडो तक्रारींची निवेदन नागरिकांनी दिली. ज्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पदयात्रे दरम्यान दानवे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या खर्चवाढीवरून सरकारला धारेवर धरले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात 1680 कोटींना मंजूर झालेली ही योजना सध्याच्या भाजप सरकारच्या काळात 2740 कोटींवर गेली.

हा 1060 कोटींचा मलिदा कोणाच्या घशात गेला? असा सवाल दानवे यांनी उपस्थित करत सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर हल्लाबोल केला. या प्रश्नाने जनतेत संतापाची लाट उसळली आणि आंदोलनाला राजकीय धार मिळाली. आंदोलनाच्या दणक्यामुळे संभाजीनगर विभागीय आयुक्त यांनी जायकवाडी धरणापासून शहरात पाणी आणणाऱ्या पाइपलाइन प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प 200 MLD पाणी पुरवण्यासाठी आहे, आणि त्याच्या प्रगतीला आता गती मिळाली आहे. आयुक्तांनी प्रकल्पाची नियमित तपासणी करून तो लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. हा सरकारी आंदोलनाच्या रेट्याचे यश असल्याचे बोलले जाते.

आंदोलनाने संभाजीनगरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय बदल घडवले. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे अंतर 12 दिवसांवरून 5-6 दिवसांवर आल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. 13 एप्रिल ते 16 मे या 33 दिवसांत चाललेले हे आंदोलन संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठे जनआंदोलन ठरत आहे. शिवसेनेने सरकारवर दबाव टाकत पाणीपुरवठा प्रकल्पाच्या प्रगतीकडे लक्ष वेधले आहे. पूर्ण समाधान आणि शहवासियांना दररोज पाणी मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार, असे दानवे यांनी ठामपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT