छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर शिवसेनेने या पक्षावर टीकेची झोड उठवली होती. पालकमंत्री संजय शिरसाट यात आघाडीवर होते. उद्धव ठाकरे यांचा पक्षा आता 'मामू' पक्ष झाला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. यानंतर शिवसेना किती मुस्लिम उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण शिरसाट यांनी हिंदुत्ववादी बाणा कायम राखत एकाही 'मामू'ला पक्षाकडून तिकीट दिले नाही.
नव्वद उमेदवारांच्या यादीवर आमदार प्रदीप जैस्वाल, निवडणुक लढणार नाही असे सांगत आक्रमक भूमिका घेणारे आणि युती तुटल्यानंतर उमेदवारी दाखल करणारे राजेंद्र जंजाळ यांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. प्रदीप जैस्वाल यांनी आपला मुलगा ऋषीकेश जैस्वाल याच्यासह आपल्या बहुतांश समर्थकांना उमेदवारी मिळवून दिली आहे. तर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी झालेल्या वादानंतरही त्यांच्यावर कुरघोडी करत आपले समर्थक मोठ्या प्रमाणात मैदानात उतरवले आहेत.
जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांनीही आपल्या समर्थकांची काही प्रमाणात वर्णी लावली. परंतु जिल्ह्याचे पालकत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या संजय शिरसाट यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. मुलगा सिद्धांत आणि कन्या हर्षदा या दोघांना उमेदवारी दिल्यानंतर समर्थ कार्यकर्त्यांवर मात्र अनेक ठिकाणी अन्याय झाल्याची भावना पहायला मिळत आहे. आता ही नाराजी शिरसाट कशी दूर करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आठ माजी महापौरांनी शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या आशेने प्रवेश केला होता. भाजपसोबत युती झाली असती तर सहाजिकच वाट्याला कमी जागा आल्या असत्या. परंतु आता युती तुटल्यानंतर जाहीर झालेल्या नव्वद उमेदवारांच्या यादीत फक्त दोन माजी महापौरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्र्यंबक तुपे, अनिता घोडेले वगळता इतर सहा माजी महापौर हे रिंगणातून बाहेर आहेत. तर युती तुटल्याचा फायदा काही ऐनवेळी बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना झाला आहे. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या तीन महिला तर एक सक्रीय पदाधिकाऱ्याला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या महानगरप्रमुख शारदा घुले यांनी उमेदवारी कापल्याचा आरोप करत मध्यवर्ती प्रचार कार्यालयात काल मोठा राडा घातला होता. पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप करत माझे काही बरेवाईट झाले तर कार्यालय जाळून टाका, अशी धमकीच शारदा घुले यांनी दिली होती. अखेर त्यांचे हे दबावतंत्र कामी आले, त्यांना पक्षाने एबी फाॅर्म देत उमेदवारी दिली आहे. राजेंद्र जंजाळ यांनी दहापेक्षा अधिक आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून दिली आहे. तिकीट वाटपाच्या राजकारणात ते वरचढ ठरल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.