Shivsena
Shivsena  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : 'या' मुद्यावरून शिवसेना शिंदे-फडणवीस सरकारला घेरणार; दिला थेट इशारा

सरकारनामा ब्यूरो

Latur News : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकित पीकविमा तत्काळ वितरित करावा, अन्यथा १९ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी आंदोलक शेतकरी "करो या मरो" या भावनेतून मागण्या मान्य झाल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून परत जाणार नाहीत.

पीकविमा द्या, नाहीतर आम्हाला तिथेच फाशी द्या किंवा गोळ्या घाला. पण आता मागे हटणार नाही, असा इशारा शेतकरी पीकविमा क्रांती आंदोलनाचे नेते व शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात दाने यांनी म्हटले,'लोकशाही पद्धतीने मागील तीन महिन्यांपासून विविध आंदोलन करीत आहोत. निवेदने देत आहोत. २१ ते २५ जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत उपोषण केले. दरम्यान, प्रशासनाने विमा वितरित करण्याचे लेखी आश्वासन दिले. पण अद्याप प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. शेतकऱ्याचा अंत न पाहता तत्काळ प्रशासनाने विमा वितरित करावा.

शेतीमालाला योग्य भाव नसल्यामुळे, अतिवृष्टी, गोगलगाय प्रादुर्भाव तसेच वाढलेला उत्पादन खर्च, मजुरी खर्च, महागाई, वन्य प्राण्यांकडून होत असलेली नासधूस, यामुळे शेतकरी त्रस्त आहे. विमा कंपनीच्या जाचक अटी, नियम, चुकीचे राबवत असलेले धोरण, प्रशासनाचे दुर्लक्ष व शेतकऱ्यांप्रती सरकारचे उदासीन धोरण यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून प्रचंड तणावाखाली शेतकरी जगत आहे.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न, शेतीचा वाढलेला खर्च करताना मेटाकुटीला आला आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन करूनही यावर कसलीच कार्यवाही, उपाययोजना होताना दिसत नाही. २४ व २५ तारखेचे लेखी आश्वासनाचे पत्र, ३० जानेवारीला आयुक्तांसोबत बैठक झाली. पण कागदी घोडे नाचवण्या पलीकडे काहीच होताना दिसत नाही.

अद्याप कसल्याच निर्णयाचे पत्र शेतकऱ्यांना दिले नाही किंवा काहीच प्रतिसाद देताना प्रशासन दिसत नाही. यामुळे नाईलाजाने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताना दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही.

जर प्रशासन आपल्याच दिलेल्या शब्दाला जागत नसेल तर लातूर जिल्ह्यातील शेतकरी १९ फेब्रुवारी शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उग्र क्रांती आंदोलन करतील, असा इशारा शेतकरी पीकविमा क्रांती आंदोलनाचे नेते तथा शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी दिला आहे.

पीकविमा द्या नाहीतर आम्हाला तिथेच फाशी द्या किंवा गोळ्या घाला, पण आता मागे हटणार नाही व याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील. प्रशासनाने शेतकऱ्यांची थट्टा न करता योग्य ती कारवाई करून परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर न्याय द्यावा, असे आवाहन लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने सचिन दाने व आंदोलक शेतकरी यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT