Chandrakant Khaire, Sandipan Bhumare
Chandrakant Khaire, Sandipan Bhumare Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire : निधी वाटपाचा हिशेब आल्याशिवाय भुमरे पालकमंत्री पद सोडणार नाहीत!

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतरही खासदार संदीपान भुमरे हे पालकमंत्री पदावर कायम आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत ते या पदावर कायम राहतील, अशीही माहिती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र भुमरे यांच्यावर टीका करत त्यांना डिवचले आहे.

पालकमंत्री म्हणून वाटप केलेल्या निधीचा हिशेब जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत ते पालकमंत्री पद सोडणार नाही, असा टोला खैरे यांनी लगावला आहे. संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी देऊन पालकमंत्री पद त्यांच्याकडे देणार असेही बोलले जाते. तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्ह्यातील दुसरे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इकडे शिवसेनेत या पदासाठी स्पर्धा सुरू असताना भाजपने पालकमंत्री पद अतुल सावे यांना द्यावे, अशी मागणी करून वादात उडी घेतली आहे.

हा सगळा घोळ सुरु असताना संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत खैरे यांनी भुमरेंना चिमटा काढला. खरंतर भुमरे यांनी आता पालकमंत्री पदावर राहू नये. पण फायलींवर केलेल्या सह्या, निधीचे केलेले वाटप याचा हिशोब व्हायचा बाकी आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते काही पालकमंत्री पद सोडणार नाहीत, अशा शब्दांत खैरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या संघर्षाला राज्यातले सरकार खतपाणी घालत आहे. यामुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. शिवसेना हा एकमेव असा पक्ष आणि हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव असे नेते होते, ज्यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. मी गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात आहे, पण बाळासाहेबांनी कधी मला जात विचारली नाही, असे खैरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनीही कधी कोणत्याच शिवसैनिकाला जात विचारली नाही. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठी अशी बाळासाहेबांची व्यापक भूमिका होती. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत.

नुकतीच मी त्यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली होती. जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे ओबीसी समाजाला आपल्या आरक्षणाला धक्का लागेल, अशी भिती आहे. यावर तोडगा काढण्याऐवजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार मात्र दोन समाजात भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT