Sambhajinagar Shivsena-BJP News : महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली युतीची बोलणी फिसकटली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अहंकार आणि हट्टापायी युती तोडल्याचा आरोप केला. तर भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी संजय शिरसाट यांनी आपल्या मुला-मुलीला तिकीट देण्यासाठी युती तोडल्याचा पलटवार केला. भाजपचे राज्य निवडणुक प्रमुख मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ऐनवेळी यादी बदलणे चुकीचे असल्याचे म्हणत शिवसेनेलाच जबाबदार ठरवले.
युती कोणामुळे तुटली? हा वाद सुरू असताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज भाजपकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाची प्रतच माध्यमांना दाखवली. एक-दोन जागांचा बदल आम्ही सुचवल्यानंतर स्वतःला मोठा भाऊ म्हणवणाऱ्या भाजपने त्यावर पुन्हा प्रस्ताव पाठवणे अपेक्षित होते, पण तो त्यांनी पाठवला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही भाजप नेत्यांनी ऐकले नाही आणि युती तोडली, आता भोगा, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी पुन्हा स्थानिक नेत्यांना सुनावले.
भाजप कार्यालयात झालेल्या राड्यावरही संजय शिरसाट यांनी तुम्ही कार्यकर्त्यांना गृहित धरता. ज्यांनी तुमच्या निवडणुकीत झेंडे हाती घेतले, तुमच्या मागे-पुढे फिरले, त्यांना तुम्ही न्याय देणार नाही. त्याचं म्हणणं ऐकून घेणार नाही, त्यांना सामोरे जाणार नाही, तर हे असे घडणारच. चुक झाली असेल तर ती मान्य केली पाहिजे. आमची कार्यालयं कुठं फुटली का? असे म्हणत शिरसाट यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत पुन्हा युती होऊ शकते का? या प्रश्नावर शिरसाट यांनी आता ते शक्य नाही. तसे घडले तर एकमेकांची डोकी फुटतील, असा इशारा दिला.
शिवसेना आता स्वतंत्रपणे आपला निवडणूक प्रचार करेल. रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न आणि त्यासाठी केलेली विकासकामं हाच आमच्या प्रचाराचा मुद्दा असेल. एकमेकांची उणीदुणी काढण्यात आम्हाला रस नाही आणि तेवढा वेळही नाही. संभाजीनगरच्या जनतेला दररोज पाणी मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यासाठीची पाणीपुरवठा योजना पुर्णत्वास येऊ लागली आहे. ती कोणी आणली? कोणाच्या काळात आली? यात किंवा त्याचे श्रेय लाटण्यात आम्ही वेळ घालवणार नाही, असेही शिरसाट यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार कसा होतो? हे नव्याने सांगण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची सभा होईल, त्यात पुन्हा मुंबई तोडण्याची भाषा, मराठी माणूस हेच मुद्दे असतील. या दोन सभा झाल्या की त्यांचा प्रचार संपला, असा टोला संजय शिरसाट यांनी यावेळी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.