Pankaja Munde Rally News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : ...म्हणून पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नये ! शेतकरी संघटनेचा इशारा

Deepak Kulkarni

Beed Political News : पनगेश्वर (ता. रेणापूर) व वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (परळी) या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकरी व मालकतोडीने वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे थकलेले आहेत. या थकीत रकमेवरुन पंकजा मुंडे यांनी शेतकरी व मुकादमांचा तळतळाट घेऊ नये, असे शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास अपेट यांनी म्हटले आहे.

पूस (ता.अंबाजोगाई) येथील प्रकाश गायके, मोरफळी (ता. धारुर) येथील पंढरी नरुटे यांनी पन्नगेश्वर साखर कारखान्याला गेल्या वर्षीच्या हंगामात प्रतिटन २५०० रुपयांनी ऊस घातला. मात्र केवळ १५०० रुपयेच दिल्याचा आरोप अपेट यांनी केला. याच कारखान्याने 2021 - 22 ला मालकतोडीने ऊस घातला.पण अजूनही कमिशन दिलं नाही, ऊसाचे पैसे ठरल्याप्रमाणे दिले नसल्याचा आरोप करत कालिदास अपेट यांनी पन्नगेश्वर साखर कारखाना मुंडे कुटुंबांचा खासगी साखर कारखाना असल्याचे म्हटले आहे.

रुई पिंपळा (ता. वडवणी) येथील गणेश आंधळे, शंकर लोंढे, मल्हारी चोले, नागोराव लाटके, मल्हारी दराडे, रावसाहेब आंधळे, बाळू चोले, परमेश्वर वडले, अशोक मुंडे, श्रीराम चोले या शेतकऱ्यांनी 2021- 22 आणि 2022 - 23 या गाळप हंगामात वैद्यनाथ साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला.

मात्र, त्यांची ऊसबिले, तोडणी, वाहतुकीची बिले, कमिशन काहीच दिले नाही. यामुळे या शेतकऱ्यांनी(Farmer) या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले. त्यांनी. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय साखर सहसंचालक शरद जरे यांनी लेखी आश्वासन देऊन या शेतकऱ्यांची बोळवण केल्याचा आरोपही कालिदास अपेट यांनी केला.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने 2021 - 22 रोजी दोन लाख 74 हजार मेट्री टन ऊसाचे गाळप केले. प्रतिटन 114 रुपये टनाप्रमाणे अजूनही FRP ची रक्कम दिली नाही. तसेच सन 2022-23 साली तीन लाख दोन हजार मेट्रीक टनाचे गाळप केले. प्रतिटन 67 रुपये टनाप्रमाणे FRP ची रक्कम दिली नाही. दोन्ही हंगामाचे मिळून पाच कोटी 14 लाख 70 हजार रुपये शेतकऱ्यांचे वैद्यनाथ कारखान्याकडून कायदेशीर येणे असल्याचेही कालिदास अपेट यांनी म्हटले आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वैद्यनाथ साखर कारखान्याने 2020 - 21चा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी 16 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची कसलीही परतफेड पंकजाताईंनी केलेली नाही. कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी एकत्रितपणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि मुकादमांच्या पाठिंब्यावर आपले राजकीय भवितव्य अवलंबून आहे. मग गोरगरिबांचे कष्टाचे पैसे का देत नाही, असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी तळतळाट घेऊ नये, असे आवाहन करत याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असेही कालिदास अपेट म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT