Supriya Sule - Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Supriya Sule News : सुप्रिया सुळेंचं अजित पवारांच्या CM पदावर मोठं विधान; " दादा मुख्यमंत्री झाले, तर..."

Deepak Kulkarni

Nanded Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत थेट बंडखोरीची वाट धरली. अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, अजितदादा सत्तेत डेरेदाखल झाल्यापासून त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना तोंड फुटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह खुद्द अजित पवारांनीदेखील मीडियासमोर खुलासा केल्यावरदेखील पुन्हा एकदा राज्यात अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चां जोर धरू लागल्या आहेत. मात्र, अशातच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदावरून मोठं विधान केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) सध्या विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गुरुवारी नांदेड येथे मीडियाशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, अजितदादा मुख्यमंत्री झाले तर सर्वात आधी पहिला हार मी घालेन, पण सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हाडाच्या भाजपच्या नेत्यांचे हाल होत आहेत. मात्र, मला आनंद आहे की, सध्या युतीच्या पहिल्या पंक्तीत आमचेच सहकारी नेते बसले असल्याचा खोचक टोलाही सुळेंनी लगावला.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पालकमंत्रिपदासाठी हे लोक दिल्लीपर्यंत जातात; मग इथे का येत नाहीत? असा खडा सवाल उपस्थित करत सुळे यांनी सर्वसामान्य जनतेची हत्या या खोके सरकारने केल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच खोके सरकार घरं फोडण्यात मग्न आहे. मात्र, लोकांच्या प्रश्नांकडे यांचं लक्ष नाही, असं म्हणत सुळे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

ट्रिपल इंजिन सरकार पालकमंत्रिपदांच्या नियुक्तीसाठी दिल्लीला जातं. त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात. मात्र, नांदेडला येत नाहीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ठाण्यात अशाच घटना घडत आहेत. या घटना वेदना देणाऱ्या आहेत. मृतांचा आकडा 24, 38 , 41 फार दुःखद असून, सरकारला लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष नसल्याची टीका सुळे यांनी केली.

फडणवीसांवर हल्लाबोल...

खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, त्यांचा विश्वास नसेल. मात्र, भाऊ म्हणून मला त्यांच्यावर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रोज शरद पवारांना नावं ठेवावीत. मात्र, नांदेडमध्ये लोकांना योग्य उपचार द्यावा, असेही त्या म्हणाल्या.

"...तर अजितदादांना 5 वर्षांसाठीच मुख्यमंत्री बनवू!"

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाविषयी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, सध्या राज्यात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत. राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार नाही आणि अजित पवारांना(Ajit Pawar) मुख्यमंत्री बनवायची वेळ आली, तर त्यांना 5 वर्षांसाठी बनवू”, असं मोठं विधान फडणवीसांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT