Beed News : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन तीव्र संतापाची लाट उसळली असतानाच भाजप आमदार सुरेश धस यांनी 'परळी पॅटर्न'चा उल्लेख करत अभिनेत्री प्राजक्ता माळीसह काही महिला कलाकारांबाबत मोठा दावा केला होता.या दाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यात प्राजक्ता माळीने देखील आधी पत्रकार परिषद आणि नंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आक्रमक पाऊल उचललं होतं.तसेच या प्रकरणात राज्य महिला आयोगही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.अशातच एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde ) शिवसेनेकडून धस-माळी वादासह देशमुख हत्येप्रकरणावर दोन मोठ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
एकीकडे सत्ताधारी पक्षातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी मोठा वादंग निर्माण झाला असतानाही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठोस भूमिका घेतल्याचे समोर आले नव्हते. पण आता शिंदेंच्या दोन बड्या शिलेदारांनी प्राजक्ता माळी आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) तसेच बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी विधानं केली आहेत.
भाजपनंतर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील ट्विट करत धस यांचे कान टोचण्यात आले आहेत. ठाण्याचे खासदार आणि शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी हे याबाबत सूचक ट्विट केलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात,बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर,बीड शहरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हजारो नागरिकांनी 'मूक मोर्चा'काढला.हे आंदोलन निश्चितच योग्य आहे, न्याय मिळवण्यासाठी आणि हत्येच्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणे आवश्यक आहे आणि न्यायही मिळेलच.आमदार सुरेश धस यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी समर्थन आणि स्वागतच करत असल्याची भूमिका मांडली आहे.
पण यामध्ये मराठी महिला कलाकार प्राजक्ता माळी यांचं नाव विनाकारण गोवण्यात येत आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय निराधार आरोप लावले जात आहेत.हे अत्यंत चुकीचं आहे.केवळ मराठी कलाकार आहेत म्हणून नव्हे तर कोणत्याही महिलेची अशा पद्धतीने मानहानी करणं चुकीचं आहे.हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. महिलांचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे, असंही खासदार म्हस्के यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करावं मात्र, या कलाकार मंडळींवर आरोप लावणं आणि त्यांची बदनामी करणं हे पूर्णपणे अनुचित आहे.सर्व संबंधित लोक या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतील, तसंच लावण्यात येणारे आरोप थांबवतील आणि त्या कलाकारांची माफी मागतील अशी अपेक्षाही म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.
मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मोठं भाष्य केलं आहे.ते म्हणाले,बीड जिल्ह्यात जी हत्येची घटना घडली, ती अंत्यत दुर्देवी आहे. ही हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आलेली आहे.या घटनेत जे-जे आरोपी असतील त्याला शासन व्हायला पाहिजे.आमचं महायुतीचं सरकार जर हे करू शकलं नाही तर तो ठपका आमच्यावर पडेल,असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.