Eknath Shinde - Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : ...अन् 'ती' घटना सरकारच्या फायद्याची ठरली; जरांगेंविरोधात भुजबळांना काढले बाहेर

Datta Deshmukh

Beed News : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनानंतर राज्यभर दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांमध्ये त्यांच्या जंगी सभा होत आहे.या सभांमधून त्यांनी सरकारसह ओबीसी नेत्यांवरही हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळांवर तर टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष पेटला असतानाच आता जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातही वादाची ठिणगी पडली आहे.पण मराठा आंदोलना दरम्यान बीडमध्ये झालेली जाळपोळ सरकारच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणत्र द्यावे व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सप्टेंबर महिन्यात अंतरवाली सराटीत (ता. अंबड, जि. जालना) येथे उपोषणाला सुरुवात केली. उपोषणावर लाठीहल्ल्यानंतर आंदोलन राज्यभर गाजले. त्यांचे उपोषण मागे घेण्यासाठी रोज एक मंत्री त्यांची भेट घेत होता. इतर लोकप्रतिनिधी व विविध पक्षांचे नेते देखील त्यांची भेट घेत होते.

मराठा आरक्षणासाठीचं उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी साखळी आंदोलन सुरू केलं आहे.उपोषण मागे घेताना त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर जरांगे पाटील आता राज्यभर मराठा आरक्षणासाठी जनजागृती करत आहेत.जरांगे यांच्या या साखळी आंदोलनादरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत.त्यांच्या सभांना लाखो लोकांची गर्दीदेखील जमत आहे. दुसऱ्या बाजूला,राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष चालू आहे.

कोंडी फोडण्याचा मार्ग सरकारला नव्हता सापडत...

अंतरवाली सराटीतील सभाही ना भूतो ना भविष्यती झाली.त्यामुळे सरकारला घाम फुटला. मात्र, कोंडी कशी फोडायची याचा मार्ग सरकारला सापडत नव्हता.उपोषणाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील तेवढाच प्रतिसाद मिळत होता.अनेक सर्कलमध्ये साखळी उपोषणे, कँडल मार्च, ठिय्या आंदोलने होत होती. यातून मार्ग काढण्यासाठी सरकार पेचात होते.महत प्रयत्नानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातले उपोषण पुन्हा मागे घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, याच दिवशी बीडमध्ये जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. या काळापर्यंत कोणीही राजकीय नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधात थेट बोलत नव्हते आणि आरक्षणालाही थेट विरोध करत नव्हते. कोणी बोलले तरी त्या बोलण्याला फार धार येत नव्हती.

बीडच्या निमित्ताने सरकारलाही आयते कोलीत...

कोणी बोलले तरी त्या बोलण्याला फार धार येत नव्हती. मात्र, बीडची घटना सरकारच्या पथ्यावर पडली. भलेही बीडमध्ये जाळपोळ व दगडफेकीच्या घटना मराठा व ओबीसी अशा दोन्ही नेत्यांची घरे व कार्यालयावर झाल्या. मात्र, मंत्री असलेले छगन भुजबळ यांना या निमित्ताने सरकारनेच ‘ओबीसी नारा’ द्यायला हवा दिली. सरकारलाही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ‘ओबीसी - मराठा’ दरी हवीच आहे. त्यामुळे बीडच्या निमित्ताने सरकारलाही आयते कोलित मिळाले.

आता भुजबळांच्या सुरात इतरही काही नेत्यांनी सुर मिसळायला सुरुवात केली असून मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही ही मंडळी टिपण्णी करत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद जरी कमी झाला नसला तरी दुसरीकडे सरकारलाही या निमित्ताने कोणीतरी खेटण्याचा प्रयत्न करणारे अस्त्र भेटले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT